कोरोना प्रसार टाळण्यासाठी संपूर्ण देशच काही काळ 'लॉकडाऊन' करण्यात आला होता. संसर्गाचा प्रसार थांबविण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत हॉटेल आणि दुकान अशा अनेक आस्थापना काही काळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाला काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य झाले. मात्र या काळात हॉटेल, इ-कॉमर्स सार्इट या सारख्या अनेक ठिकाणांमधून पार्सल सेवेचे प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणात वाढले. या वाढत्या पार्सल संस्कृतीमुळे कोरोना काही प्रमाणात नक्कीच थांबला मात्र त्यामुळे आता पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे अचानकपणे वाढलेल्या पार्सल वेस्टचा.
पर्यावरणात विघटित न होणाऱ्या या वेस्टमुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. योग्य प्रक्रीया पार पाडली गेली तर या कचऱ्यातून देखील पर्यावरणाची सुटका होऊ शकते. पुणे महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या स्वच्छ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनच्या काळात शहरात जमा झालेल्या प्लॅस्टिक कचऱ्यात सुमारे 75 ते 80 टक्के कचरा हा पुनर्वापर करण्यात येण्यासारखा होता. परंतु त्या त्याच्यावरील प्रक्रिया करणे शक्य झाले नाही. कारण या काळात प्रक्रिया प्रकल्प बंद असल्यामुळे हा कचरा थेट लॅंडफिलसाठी (भराव) पाठविण्यात आला. जमा झालेल्या कचऱ्यात सर्वाधिक प्रमाण मल्टीलेअर प्लॅस्टिकचे (45 टक्के) होते.