"राजकारण हे फक्त नेत्यांच्या मुला-सुनांनीच करायचे? कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? " ही असंख्य कार्यकर्त्यांची खंत तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकली असेल. हे बरोबरही आहे. कारण निवडणुकीत तिकीट देताना 'विजयाची खात्री' हा एकमेव निकष सर्वच राजकीय पक्ष लावतात. मग या निकषात सहाजिकच राजकीय नेते, त्यांचे वारसदार आणि मनी-मसल पॉवर असणाऱ्यांचाच नंबर लागतो. मग इतरांनी राजकारण करायचेच नाही का? निवडणुका लढवायच्या नाहीत का? याचे उत्तर आहे... हो लढवायच्या; पण पूर्ण तयारीनिशी! 'फक्त लढ म्हणा' म्हणून कोणतीही निवडणूक ना लढता येते ना जिंकता. त्यासाठी लागतात अपार कष्ट, काम करण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काटेकोर नियोजन. या गोष्टी असतील तर तुम्हाला येत्या निवडणुकीत नगरसेवक होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.