

Warkari saints' contribution to Indian integration
esakal
डॉ. निवृत्तीनाथ रेळेकर यांच्या मते, संत नामदेव इ.स. १३२९ ते १३४९ या वीस वर्षांत उत्तर भारतात होते. या दरम्यान गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या भागांत त्यांनी चार-पाच वेळा भ्रमंती केली. याचा अर्थ संत नामदेव वीस वर्षे फक्त पंजाबात राहिले नाहीत, तर इतर प्रांतातसुद्धा त्यांचा वावर असायचा. मग ते पंजाबात सलग किती वर्षे राहिले असावेत, हा प्रश्न पुन्हा पडतोच. उत्तर भारतात जाताना त्यांनी आपल्या कोणाही आप्ताला सोबत घेतले नव्हते का? असे एकेक अनुत्तरीत प्रश्न संत नामदेवांच्या उत्तर भारताच्या भ्रमंतीसंबंधी हाती येतात.
संत ज्ञानेश्वरांदी भावंडांसोबत उत्तरेची तीर्थयात्रा केल्यानंतर संत नामदेवांनी पुन्हा उत्तरेकडे जाण्याचा विचार केला. दुसऱ्यांदा (की आणखी काही वेळा) त्यांनी हा विचार कधी केला आणि कधी ते पुन्हा उत्तरेच्या प्रवासाला कधी निघाले यामध्ये मात्र अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाहीच, आणि ती तशी असणे शक्यही नाही. पण ज्ञानेश्वरांदी भावंडांशी मैत्रभाव जुळल्यानंतर काही म्हणजेच दोन-तीन वर्षांतच ज्ञानेश्वरादी भावंडांनी एकापाठोपाठ समाधी घेतल्या. त्यानंतर नामदेवांना स्वाभाविकच एकाकीपण जाणवायला लागले असणार. ज्या योगी पुरुषाशी आपला मैत्रभाव जुळला, तोच आपल्यापासून दूर गेला, ही भावना नक्कीच त्यांच्या काळजाला कुरतडणारी ठरली असावी.
त्या चारही भावंडांच्या समाधींच्यावेळी नामदेव प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते. त्यांच्या समाधीचे वर्णन नामदेवांनी करून ठेवले आहे. तो प्रत्यक्षातला अनुभव मांडून ठेवणे त्या काळाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. आपल्या स्वजनांना आपल्या नजरेसमोर हे विश्व सोडून जाताना पाहणे, हा अनुभव अतिशय दुःखद असणार आणि पोरकेपणाची भावना अंतःकरणाला पोखरणारी अशीच असणार. त्याप्रसंगी आपल्या मनःस्थितीचे वर्णन संत नामदेव पुढीलप्रमाणे करतात-