

Climate Change and Urban Cementization Problems
esakal
राज्यासह देशभर यावर्षी उन्हाने कहर केला आहे. महाराष्ट्रातील अकोला शहराचे तापमान तब्बल ४७.२ अंशावर गेले व हे शहर त्या दिवशी जगातील सर्वांत उष्ण शहर होते... उष्णतेचा हा कहर एप्रिल व मे महिन्यात जवळपास सर्वच शहरांत जाणवला, विदर्भात त्याचा चटका तुलनेने अधिक होता. याला वैश्विक तापमान वाढीसह काही स्थानिक मुद्देही कारणीभूत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, जंगलांची अमर्याद तोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेले शहरांचे सिमेंटीकरण यांमुळे भविष्यात तापमान असेच वाढत जाण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करतात.
मे महिन्यातील सोमवारची दुपार... घड्याळाने बारा वाजल्याची चाहूल दिली... अकोल्याच्या रस्त्यांवर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला होता. शहरातील मुख्य चौकात नेहमी दिसणारी वर्दळ त्या दिवशी गायब होती. डांबरी रस्त्यांवरून उसळणाऱ्या उष्णतेच्या लाटा डोळ्यांना जाणवत होत्या. चौकातील पाणपोईवर पाण्याचा एक घोट मिळावा म्हणून नागरिकांची रांग लागली होती. चेहऱ्यावरून ओघळणारा घाम आणि डोळ्यांतील थकवा अकोल्याच्या तापलेल्या वास्तवाची साक्ष देत होता...!