

Anil Awachat Jawalche Book Review
esakal
श्रेया माधवी
लेखक लडिवाळपणे भूतकाळातल्या माणसांना ‘आपलं’ म्हणतात. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांची मायेनं नावं घेऊन जणू त्यांना हाक मारतात. ‘माझा शिवबादादा’, ‘डार्विन आजोबांची शिकवण’, ‘बहिणाई माझी लाडाची’ या शीर्षकांमधून त्यांना दादा, ताई, आजी-आजोबा म्हणताना ती माणसं आपली घरचीच, रोजच्या उठण्या-बसण्यातील मंडळी आहेत, असं जाणवतं.
बरेचदा अनावधानानं खरेदी केलेलं किंवा चुकून हाती पडलेलं पुस्तक वाचताना ‘हे पुस्तक आपल्याला आधी का मिळालं नाही? का बरं आपल्या वाचनात आलं नसेल?’ असं वाटून जातं. नुकतंच अनिल अवचट यांचं जवळचे हे पुस्तक वाचनात आलं. हे पुस्तक खरंतर अवचटांच्या निधनानंतर, दोन वर्षांपूर्वीच प्रकाशित झालेलं; माझ्या हाती अगदीच अनावधानानं लागलं. ओळखीतल्या एका दादानं हे पुस्तक पुणे पुस्तक महोत्सवात माझ्या हातावर टेकवलं आणि म्हणाला वाचून झालं की तुझा अनुभव सांग. काही दिवसांनी मी पुस्तक वाचायला सुरुवात केली, तेव्हा ‘बरंच झालं, हाती लागलं’ ही भावना मनात आली. कमाल पुस्तक. पुस्तकाचे लेखक अर्थातच अवलिया माणूस!