

AI Impact and Risks
esakal
प्राची गावस्कर
जगभरात एआयविषयी दोन मुख्य प्रवाह दिसून येत आहेत. पहिला प्रवाह विकसित राष्ट्रे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा आहे, तो अत्यंत प्रगत, स्वायत्त यंत्रणा आणि तांत्रिक वर्चस्वावर केंद्रित आहे. दुसरा प्रवाह विकसनशील देशांमधील ‘वापर आणि प्रभाव’ यावर आधारित आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ः आभासाकडून वास्तवाकडे हे पुस्तक या दोन टोकांमधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करते.
सध्या जगभरात एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’. एकीकडे एआयमुळे नोकऱ्या जाणार अशी भीती आहे, तर दुसरीकडे एआयमुळे नोकऱ्या निर्माणही होऊ शकतात. सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणूनही याकडे पाहिले जात आहे, त्याचवेळी हे तंत्रज्ञान पुढे जाऊन मानवावरच वर्चस्व गाजवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशात या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणले जात आहेत. तर याचा गैरवापर करून मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केला जाऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. अशा कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतच्या नेमक्या जोखमी काय आहेत, जगभरात यामध्ये कसे संशोधन होत आहे, याचा कसा वापर केला जात आहे, जागतिक पातळीवर विविध देश याकडे कसे बघत आहेत, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, विचारवंत यांचे दृष्टिकोन काय आहेत अशा असंख्य पैलूंचा वेध घेत; जागतिक भविष्यविषयक विचारवंत आणि स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे सह-संस्थापक संदीप वासलेकर यांनी एआयबाबत भीती किंवा अतिरेकी आशावाद न मांडता वास्तववादी विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता ः आभासाकडून वास्तवाकडे या पुस्तकात केले आहे.