

Urban Political Thrillers in Marathi
esakal
तन्मय कानिटकर
पुढच्या दशकात भारतातली बहुतांश लोकसंख्या शहरी भागातच राहणार आहे. या एकेका शहराचे हजारो कोटी रुपयांचे अर्थसंकल्प आहेत. अशा वेळी शहराचं राजकारण सुटसुटीत, सोपं आणि सरळ असेल असं शक्यच नाही. शहरांच्या राजकारणाच्या या क्लिष्टतेचा वेध घेणारं लेखन करावं असं माझ्या मनानं घेतलं. एका बाजूला लेखनाचा समृद्ध वारसा आणि दुसऱ्या बाजूला माझ्या सामाजिक-राजकीय कामाचा अनुभव. आठवं घर ही माझी कादंबरी या दोन्हीचा मिलाफ आहे.
‘घराणेशाही’ हा शब्द ऐकल्यावर सामान्यतः राजकारणातली घराणेशाही डोळ्यासमोर येते. फारतर उद्योग जगतातल्या घराणेशाहीची उदाहरणं सांगितली जातात. पण लेखकांची घराणेशाही हा प्रकार तसा विरळाच. माझ्या खापरपणजोबांनी, प्रल्हाद कानिटकर यांनी पुस्तक लिहिलं होतं असं ऐकून आहे. माझे पणजोबा राजाराम प्रल्हाद उर्फ रा. प्र. कानिटकर यांची कित्येक पुस्तकं आजही विकली जातात. प्रसिद्ध संपादक, कथाकार आणि कादंबरीकार माधव कानिटकर म्हणजे माझे आजोबा. तर माझे आई-बाबा म्हणजे महेंद्र आणि डॉ. गौरी कानिटकर यांनीही अनेक पुस्तकं लिहिली. अशा प्रकारे लेखनाचा समृद्ध वारसा मला घरातूनच मिळाला. माझं वाचन भरपूर आणि चौफेर असावं, मी लेखन करावं यासाठी आई-बाबा, आजोबा यांनी बढावा दिला.