

Cherrapunji Rainfall
esakal
सई गणेश कोरे
लहानपणी शाळेत भूगोल शिकताना जगातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून चेरापुंजीची ओळख झाली. प्रत्येकाने कमी-अधिक प्रमाणात पाऊस अनुभवलेलाच असतो. महाराष्ट्रात माळशेज घाट, ताम्हिणी घाट, आंंबोली घाट हे सर्वाधिक पावसाचे प्रदेश म्हणून ओळखले जातात. मला शालेय वयापासूनच जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीचे आकर्षण होते. मनातील इच्छा पूर्ण होत मेघालयातील चेरापुंजीचा पाऊस व निसर्ग अनुभवण्याचा योग आला. या चिंब सफरीचा अनुभव...
मेघालयामध्ये जाताना मनात उत्सुकता, हुरहूर आणि पावसाची भीती होती. किती पाऊस असेल, याचे मनात आडाखे बांधणे सुरू होते. आम्ही विमानाने पुण्यातून गुवाहाटीला पोहोचलो. तेथून मॉफलाँग गावाकडे निघालो. गावात ७०० ते ८०० वर्षांपासून असलेले जंगल स्थानिकांनी चांगल्या प्रकारे जतन केले आहे. त्या जंगलाला ‘सेक्रेड फॉरेस्ट’ असे म्हणतात. या लोकांसाठी हे जंगल देवासमान आहे. स्थानिकांच्या भावनेनुसार, देव आपल्यावर प्रसन्न असेल, तर जंगलात बिबट्यांचा वावर आढळून येतो. जर आपल्याकडून काही कमतरता राहिली असेल, तर देव सापाच्या रूपात दर्शन देत नाराजी व्यक्त करतो. मानवाने निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून त्याचा आदर केला पाहिजे, हे येथील लोकांनी ओळखले आहे. या जंगलामध्ये दिवसातील विशिष्ट वेळेतच जाता येते. त्या वेळेनंतर जंगलात जाण्यास प्रतिबंध आहे.
या जंगलात ४००पेक्षा जास्त ज्ञात वनस्पती व साधारण ४०० संशोधन न झालेल्या प्रजाती आढळतात. येथे सतत धुके पसरलेले असते. येथे उभ्या केलेल्या दगडांच्या रूपात मेघालयातील संस्कृती दर्शवण्यात आली आहे. तीन मोठे दगड घरातील पुरुषांचे प्रतिनिधित्व करतात, तर त्याच्यापुढे असलेला आडवा मोठा दगड घरातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करतो. त्याखाली असलेले छोटे दगड लहान मुलांचं प्रतिनिधित्व करतात. मेघालयातील खासी संस्कृतीत स्त्री कुटुंबाची जबाबदारी पेलते. ही जबाबदारी पेलत असताना स्त्रियांना पुरुष संरक्षण देतात. म्हणून तेथील व्यवसाय स्त्रियाच सांभाळतात. हा परिसर आणि त्या परिसरातील ग्रामसंस्कृती पाहण्यात, अनुभवण्यात पहिला दिवस संपला.