

Importance of Books in Life
esakal
‘रील्स’ नावाच्या गुंडाळीत स्वतःला अडकवून घेण्यापेक्षा, वेगवेगळ्या विषयांचे ‘ट्रिगर्स’ एकापाठोपाठ एक मेंदूवर आदळवून घेण्यापेक्षा; कोणाचे तरी ‘गिऱ्हाईक’, कोणाच्या तरी हातातील ‘साधन’ बनण्यापेक्षा; किंवा उगीचच कोणाचा तरी ‘श्रोता’ वा ‘प्रेक्षक’ बनून बड्या कंपन्यांनी तयार केलेल्या ‘अल्गोरिदम’च्या जाळ्यात अडकण्यापेक्षा पुस्तक वाचनाची कास धरणे केव्हाही चांगलेच. ती सवय आपल्याला समृद्ध करेल. आपले ‘कर्तेपण’ जपेल. आज गरज आहे, ती या नव्या मुक्तिलढ्याची!
माहिती मिळविण्याची साधने आता इतकी विपुल झाली आहेत, की त्या बाबतीत ‘धबाबा तोय आदळे’ अशी स्थिती झाली आहे. इंटरनेटने जग जोडले आणि स्मार्टफोनमुळे तर ‘दुनिया माझ्या मुठीत’ असे वाटू लागले. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या समाज माध्यमांनी आपल्याला अक्षरशः वेढून टाकले आहे. त्यांनीच आपला दिनक्रम ठरवायला सुरुवात केली. या आभासी जगात अनेकजण रमू लागले आणि दमूही लागले. याचे कारण रील्सच्या वेढ्यात आपण किती काळ घालवला याचेच भान आपण विसरू लागलोय. त्याचे आकर्षण अक्षरशः खेचून घेणारे आहे, यात शंकाच नाही. पण त्याचे दुष्परिणाम जसजसे समोर येत आहेत, तसतसा हा ‘नशिला पर्दा’ भीतिदायक वाटू लागला आहे. या स्क्रीनच्या आधीन झालेल्या पिढीचे काय होणार अशी रास्त चिंता पालकांना वाटू लागली आहे. एवढेच नव्हे, तर व्यसनमुक्ती केंद्रांत पुनर्वसनासाठी जाणाऱ्या रुग्णांमध्ये या नशिल्या पडद्याच्या आहारी गेलेल्यांचा समावेश होऊ लागला आहे. याचा एक परिणाम अर्थातच पुस्तक वाचनावरही झाला आहे. माहिती आणि ज्ञान जर या अत्याधुनिक माध्यमांतून मिळत असेल, तर पुस्तक वाचनाचे एवढे प्रस्थ कशासाठी असे कोणी विचारू शकेल. पण जर नीट विचार केला तर पुस्तक वाचनाचे फायदे कितीतरी लक्षात येतील आणि ‘स्क्रीनमुक्ती’ची आवश्यकताही पटेल.