

Classic Indian Cinema 1960s
esakal
सुलभा तेरणीकर
उटीच्या निसर्गात शाल ओढून घेतलेली वहिदा, ‘खोया खोया चाँद खुला आसमाँ’ हे गाणं आणि विशेष करून गाण्यातली ‘आँखों में कैसे नींद आएगी’ ही ओळ म्हणणारा देव आनंद... हे दृश्य किती वेळा पाहू असं झालं होतं प्रेक्षकांना! या गाण्याची सुंदर कल्पना शैलेंद्र यांनी दिली होती. खुल्या आकाशात कुठेतरी हरवलेल्या चंद्राविषयीच्या त्या गाण्यानं घातलेली मोहिनी आम्ही रफींच्या आवाजात आजही शोधतोय. ब्लॅक ॲण्ड व्हाइट पडद्यावर कविताच उतरली होती जणू!
भारतीय चित्रपट बोलायला, गायला लागला होता, त्यालाही तीस वर्षं झाली होती. चित्रपट कृष्णधवलच होते, पण मधूनच रंगीत चित्रपटांची झलक दिसत असे. ब्लॅक ॲण्ड व्हाइटची रुपेरी जादू आपल्या सिनेमावर पसरली होती. हिंदी, मराठी, बंगाली अन्य भाषांमधले चित्रपट भाषांचं, संवादांचं, कथांचं, गाण्याचंं वैभव दाखवत होते. १९६०-६१ सालचे कन्यादान, जगाच्या पाठीवर, वैजयंता, कलंक शोभा, सुवासिनी असे मराठी सिनेमे आणि हिंदीतले कालाबाजार, छलिया, बम्बई का बाबू आकर्षित करत होते. बिनाका गीतमालेची लोकप्रियता शिखरावर होती आणि तरुणाई ‘खोया खोया चाँद’वर फिदा होती.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, विधवा पुनर्विवाहाची प्रथा आणि चळवळ समाजात रुजू पाहत होती. त्याला एक सबळ भावनिक आधार लागतो, तो मराठी चित्रपटांतून हलक्या पावलानं पुढे येऊ पाहत होता. पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘जगावेगळं सासर’ या कथेवर आधारित, कोल्हापुरात तयार झालेला कन्यादान हा चित्रपट लक्षवेधी ठरला. उषा किरण, राजा गोसावी, दादा साळवी, इंदिरा चिटणीस, वसंत शिंदे अशी कसलेली मंडळी यात होती. आपल्या विधवा सुनेचा पुनर्विवाह करून देण्यासाठी पुढे आलेल्या सासऱ्याची भूमिका दादा साळवी यांची होती. अतिशय संवदेनशील विषयावरचा हा चित्रपट फार गाजला.