डॉ. सदानंद मोरे
अमेरिका वेगळे राष्ट्र म्हणून पुढे आली ती स्वातंत्र्याच्या ऊर्मीतून. अमेरिकेतील ब्रिटिशांनी साम्राज्यवादी ब्रिटिश सत्ताधाऱ्याचे वर्चस्व झुगारत युद्ध केले व स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.
पण याचा अर्थ असा होतो, की अमेरिकेची ही ओढ किंवा ऊर्मी आपला देश स्वतंत्र करण्यापुरतीच मर्यादित होती. जगातील इतर परतंत्र राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांच्यावर सत्ता गाजवणाऱ्या आपण राष्ट्रांशी युद्ध वगैरे करावे, असे काही अमेरिकेने करायचे कारण नव्हते.
एकूणच जगाची सांस्कृतिक व राजकीय विभागणी करताना पौर्वात्य आणि पाश्चात्त्य अशी करायची प्रथा आहे. किंबहुना ही दोन्ही जगते वेगळी आहेत असे मानण्यापर्यंत, विशेषतः पाश्चात्त्य अभ्यासकांचा व राजकारण्यांचा कल राहिला आहे. पाश्चात्त्य जगातच, आधुनिक किंवा मध्ययुगोत्तर काळात विविध राष्ट्र-राज्यांचा (Nation States) उदय झाला. त्यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष झाला. त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने पौर्वात्य देशांत चंचुप्रवेश करून तेथे आपली वासाहतिक राज्ये उभारली, त्या राष्ट्रांना जिंकून आपापली साम्राज्ये स्थापन केली.
या चढाओढीत ब्रिटन ऊर्फ इंग्लंड अग्रेसर ठरले. पुढे याच राष्ट्रांच्या परस्पर स्पर्धेतून दोन महायुद्धे झाली. त्यांत भीषण नरसंहार झाला. हा सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. या राष्ट्र-राज्यांमधील प्रत्येकाच्या स्वतंत्र अशा अस्मितांचा व अर्थात त्यातून झालेल्या स्पर्धा-संघर्षाचा मुद्दा जमेस धरूनही त्यांच्यात एक सामुदायिक अस्मितेचे भान व अभिमान पहिल्यापासूनच वसत आला आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
‘East is East, and West is West’ असे म्हणत ‘and never the twain shall meet’ असा निष्कर्ष काढणारा कवी रुडयार्ड किपलिंग इंग्रज असला आणि त्याच्यात आपण इंग्रज असल्याचा अभिमान ओतप्रोत असला, इतकेच नव्हे तर पाश्चात्त्य राष्ट्रांच्या संघर्षाची जाणीवही त्याला असली, तरी आपण सारे मिळून पाश्चात्त्य आहोत व म्हणून पौर्वात्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत या सामूहिक अस्मितेपासून तो अलिप्त नव्हता.