

Delhi Travel Experience
esakal
सुप्रिया श्रीधर मोरे
दिल्लीत आल्यानंतर देशाच्या राजधानीत आल्याचे अप्रूप वाटले. दिल्लीमध्ये मोठे आणि नेटके रस्ते आहेत. दिल्लीच्या मेट्रोचे जाळे लक्ष वेधून घेत होते. जुन्या दिल्लीत रस्त्याच्या दुतर्फा मुंबईसारख्याच लहान-लहान वस्त्या दिसत होत्या. ऐतिहासिक मुघलकालीन लाल किल्ला न पाहता ‘दिल्लीवारी’ पूर्ण होऊच शकत नाही.
लहानपणापासून काही विशिष्ट ठिकाणी जायचे स्वप्न मनात असते. गोष्टी अनुभवण्याची, पाहण्याची इच्छा असते. प्रवासाची आणि भटकंतीची आवड असेल, तर हे स्वप्न पूर्ण होते. सुदैवाने माझ्या पतीलाही भटकंतीची आवड असल्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत आमची भटकंती व्हायची. सहली, निसर्ग, देवदर्शन, गड, गाठीभेटी अशा वेगवेगळ्या निमित्ताने जवळजवळ अर्धा महाराष्ट्र आणि भारतातील बरीच पर्यटन स्थळे पाहून झाली होती. उत्तर भारत मात्र तेवढा बघायचा राहिला होता. त्यामुळे ती इच्छा बरेच दिवस मनात रेंगाळत होती. मला दहावीला असल्यापासूनच वाघा बॉर्डर आणि ताजमहाल पाहायचा होता. त्यामुळे कुटुंबियांना आपण आता तिकडे फिरायला जाऊ या, असे सांगितल्यानंतर पती, मुले, सुना, नातवंडे सगळेच तयार झाले. आग्रा, मथुरा, वृंदावन, दिल्ली, अमृतसर येथे सात दिवस जायचे ठरले. प्रवास व हॉटेल बुकिंग्ज केलेत. अमृतसर आणि आग्रा यांतील अंतर अधिक असल्यामुळे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्लॅन ठरला. त्यानुसार आम्ही घरातले दहाजण तयारीनिशी निघालो.
दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचे आम्ही बुकिंग केले होते. स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचे अंतर आणि बॅगांचे ओझे यांनीच आमच्या सहलीचे उद्घाटन केले. पण यातही मजा आली. धावतपळत एकदाचे गाडीत शिरलो. तेव्हा किशोर कुमारांच्या गाण्याची आठवण झाली - गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है।