

Debate on Peace, Politics and Just War in Modern World History
esakal
भीष्माशी झालेल्या संवादात अर्जुनाने एक महत्त्वाचे तक्रारवजा निरीक्षण नोंदवले आहे ते म्हणजे राजकार्य व धर्मचर्चा यांच्यात मूलतःच विरोध आहे. भीष्माने त्याला काय सांगितले त्याच्या तपशिलात जायचे कारण नाही. मुद्दा एवढाच आहे. क्वेकरांना त्यांचे समाधान होईल असे काही सांगू शकणारा भीष्म भेटला नाही. कृष्ण तर नाहीच नाही.
विश्वाचे आर्त हा महाप्रकल्प एक प्रकारचा प्रवास आहे असे रूपक करून, त्याची स्थितिगती तपासून पाहणे, सिंहावलोकनासारखे परीक्षण करणे मला पद्धतिशास्त्रीयदृष्ट्या आवश्यक वाटते. प्रवासाला सुरुवात करताना प्रवासाचे गंतव्य किंवा मुक्काम ठरवूनच पाऊल टाकले जाते हे उघड आहे. गंतव्याबरोबरच दिशा आणि मार्ग यांचीही जाणीव असणे आवश्यक असते. या गोष्टींची किमान स्पष्टता गृहीत धरूनच प्रवास केला जातो. तरीही प्रवासात अधूनमधून आपण कोठपर्यंत आलो आहोत, भरकटलो तर नाही ना, रेंगाळलो तर नाही ना याची खातरजमा करून घ्यावी लागते. तसे आपण प्रस्तुत महाप्रकल्पाच्या संदर्भात करीत आलो आहोत.
आपल्या प्रवासाचे एक परिमाण अर्थातच काळ हे आहे. काळ म्हणजेच इतिहास. हे परिमाण प्रवासाला लावता येते, कारण ते माणसाच्या कृतीला लावता येते. आपण लिहितो त्या हकिकतीला इतिहास म्हटले जाते हे खरेच; पण या लिखित किंवा कथित इतिहासात आपल्याला प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा प्रवाह पकडायचा असतो. म्हणजेच ‘इतिहास’ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. पहिला अर्थ म्हणजे कालौघात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना आणि दुसरा अर्थ म्हणजे या घटनांचे शब्दबद्ध रूप. प्रत्यक्ष घटनाक्रमात्मक इतिहासाला आपण इतिहास-१ म्हणू व घटना घडून गेल्यानंतर हा क्रम शब्दात मांडणाऱ्या इतिहासाला इतिहास-२ म्हणू. प्रस्तुत महाप्रकल्प हा इतिहास-२ या अर्थाने इतिहास आहे.