

Cultural significance of rock cut caves in Indian history
esakal
हे सदर इथं संपत असलं, तरी आपली ही पाषाणी नाळ कधीच तुटणार नाही. पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही एखाद्या लेण्याच्या पायथ्याशी उभं राहाल, तेव्हा एक पर्यटक म्हणून नाही, तर एका ‘वारसदारा’च्या अभिमानानं तिथं पाऊल ठेवा; त्या दगडांवर हात फिरवा, तिथल्या मातीचा वास घ्या आणि मनाला सांगा ‘हा माझा वारसा आहे, ही माझी ओळख आहे.’ हा वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी आता आपली आहे.
मा नवी संस्कृतीचा इतिहास केवळ युद्धांच्या कथांनी किंवा राजवंशांच्या वंशावळींनी तयार झालेला नसतो, तो कोरला गेलेला असतो तिथल्या पाषाणांच्या काळजात; जे पाषाण आजही सह्याद्रीच्या डोंगररांगांत आणि विंध्य पर्वताच्या कुशीत श्वास घेत आहेत. लयनकथा या सदरातून आपण याच पाषाणी वारशाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रवास सुरू झाला होता भीमबेटकाच्या त्या अंधाऱ्या आदिम गुहांमधून, जिथं रंगांच्या पहिल्या रेषेतून मानवानं आपलं अस्तित्व सिद्ध केलं होतं, आणि त्याचा हा सुंदर टप्पा पुण्याच्या गजबजलेल्या शिवाजीनगरमधल्या पाताळेश्वरच्या शांततेत येऊन विसावला. हे केवळ दगडात कोरलेले खांब किंवा मूर्ती नव्हत्या, तर ती होती त्या काळातल्या माणसांची स्वप्नं, त्यांची अफाट जिद्द आणि निसर्गावर विजय मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती. डोंगरकपारीत छिन्नी-हातोड्याचे घाव घालताना त्या अज्ञात शिल्पकारांनी केवळ देवालयंच घडवली नाहीत, तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा एक असा अध्याय लिहिला, जो काळाच्या प्रवाहानं कधीही पुसला जाणार नाही. नाशिक-पैठणच्या मार्गावरच्या व्यापाऱ्यांचे विसावे असोत, किंवा कडेकपाऱ्यांत तपश्चर्या करणाऱ्या भिक्खूंची ध्यानकेंद्रं, प्रत्येक लेण्यानं आपल्याला मानवी जीवनाचा एक वेगळा पैलू उलगडून दाखवला.