

जवळचे शहर : छत्रपती संभाजीनगर
जवळचे विमानतळ : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विमानतळ, चिखलठाणा
जवळचे रेल्वेस्थानक : जळगाव जंक्शन
जवळचे बसस्थानक : छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस)
केव्हा जाल? : नोव्हेंबर ते फेब्रुवारी
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अजिंठा गावापासून सहा किलोमीटरवर असणारा हा ३० बौद्ध लेण्यांचा समूह. इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. सहावे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात, दोन टप्प्यांमध्ये या लेण्यांची निर्मिती झाली. या लेणीसमूहामध्ये हीनयान आणि महायान या दोन्ही पंथांची अत्यंत सुंदर लेणी पाहायला मिळतात. यांचे आकर्षण म्हणजे येथील भित्तिचित्रे. या चित्रांद्वारे जातकादी ग्रंथांतील गौतम बुद्धांच्या कथा दर्शवल्या आहेत. त्याकाळी ही चित्रे काढण्यासाठी भिंतींवर प्रथम माती, शेण, भाताचा भुसा किंवा ताग आणि तुसाचा गाळ या मिश्रणाचा लेप चढवीत. त्यावर चुन्याचा एक हलका हात मारून, चकचकीत पातळ थर तयार करत. त्यावर गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात क्रमाक्रमाने नैसर्गिक वनस्पतींनी तयार केलेले रंग भरीत. १५००वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनदेखील ही चित्रे आजही उठावदार दिसतात. हजारो वर्षे या लेणी निर्मनुष्य अवस्थेत होत्या. इंग्रज अधिकारी जॉन्स स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी फिरत असताना त्याला या लेणी २८ एप्रिल १८१९ रोजी सापडल्या. तेव्हा त्याने दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर स्वतःचे नाव आणि त्यादिवशीची तारीख कोरून ठेवली, ती आपल्याला आजही पाहायला मिळते. प्राचीन बौद्ध वास्तुकलेचा उत्तम वारसा असलेली ही लेणी १९८३मध्ये युनेस्को जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आली.