

Satara Agriculture Development
esakal
भाग्यश्री फरांदे
महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सातारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनाही भेडसावत आहेत. परंतु, प्रश्नाचे रूपांतर संधीत करण्याचे धाडस इथल्या शेतकऱ्यांनी नेहमीच केल्याचे दिसते. पिकांची विविधता आणि उत्पादकता येथील शेतकऱ्यांनी दुप्पट केली असली, तरीही जागतिक उत्पादनाच्या तुलनेत अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे कृषी व्यापार आणि शेतमाल प्रक्रियेत प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता जिल्ह्याकडे आहे.
गड, किल्ले, धबधबे, कास पठार, कोयना धारण, पाचगणी-महाबळेश्वर यांबरोबरच साधा, सरळ आणि कष्टाळू शेतकरी हे सातारा जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सातारा जिल्हा हा लढाऊ बाणा आणि क्रांतिकारी विचारांचा वारसा असलेला, पुढारलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या विचार-वारशाचे जतन आणि संवर्धन खेड्यापाड्यांत शेतकऱ्यांच्या घरातच झाले. स्वातंत्र्य लढा आणि सामाजिक परिवर्तन चळवळींमध्ये प्रामुख्याने शेतकरी समाज सहभागी होऊन अग्रेसर राहिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक पुढारपणाचे श्रेय शेतकऱ्यांना जाते.
सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी बैल आणि लाकडी नांगर घेऊन शेती करणारा शेतकरी आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेती करतो आहे. जगाच्या पटलावर आपले स्थान निर्माण करतो आहे. मागील शंभर वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले. विशेषतः मागील पन्नास वर्षांत दुष्काळी गणल्या जाणाऱ्या तालुक्यात पीक पद्धती बदलली. शेतीची साधने, पिकांचे प्रकार, खते, औषधे यांची उपलब्धता व त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यातही बदल झाला. किर्लोस्कर आणि त्यानंतर कुपर यांच्या लोखंडी नांगरांची निर्मिती येथेच झाली. या नांगरांचा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचार प्रसार केला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हतबल आणि दयनीय स्थितीला शिक्षणाचा अभाव कारणीभूत असल्याचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला असावा. या दोन्ही नांगरांमुळे शेती प्रगतीला चालना मिळाली.