

Responsible Tourism India
esakal
ओंकार ओक
मित्रांनो, भारतात वारसास्थळांची अक्षरशः रेलचेल आहे. आपण भारतीय याबाबतीत खूपच नशीबवान आहोत. अलीकडेच महाराजांचे बारा किल्लेही युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे चला, काही मूलभूत नियम पाळू या व पर्यटक ते अभ्यासक हा प्रवास यशस्वीपणे सुरू करू या.
साधारणपणे मागच्या फेब्रुवारीतली गोष्ट. पुण्यातल्या एका नामांकित संस्थेबरोबर व केतन पुरी या तरुण इतिहास, लेणी व मूर्तिशास्त्र अभ्यासकासोबत वेरूळला गेलो होतो. पुरातत्त्व खात्यानं अत्यंत निगुतीनं जपलेलं हे वारसास्थळ. कैलास लेण्यासारखी एकमेवाद्वितीय कलाकृती, पौराणिक कथांना दृश्यरूपात साकारणारी अजोड शिल्पं व एकूणच भारतीय संस्कृतीचा आणि कलात्मतेचा सुरेख मिलाफ असलेलं हे स्थळ! पण कितीही काहीही झालं, तरी केतनच्या वाणीमुळे भारावून गेलेल्या व आमच्या ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक वारसा रसिकाला एक गोष्ट मात्र स्पष्टपणे जाणवली. तिथं येणारा प्रत्येक पर्यटक भले अभ्यासाच्या दृष्टीनं आला नसेलही, पण एक अत्यंत मूलभूत गोष्ट मात्र तिथल्या बहुतांश पर्यटकांमध्ये (सगळेच नाही... काही मोजके जे या इतरांनाही भारी पडले!) समान होती आणि ती म्हणजे ‘Lack of awareness and discipline’! आमचं माहिती सत्र सुरू असताना शेजारीच काही पर्यटकांनी आपल्यातल्या ‘विविध गुणांचं’ जे काही उन्मुक्त प्रदर्शन सुरू केलं त्याला तोड नव्हती! समोर अभ्यासक माहिती देत आहे, ती ऐकायचं तर सोडाच, पण किमान त्याला त्रास होणार नाही इतपत तरी शुचिता बाळगणं याही सिव्हिक सेन्सचा संपूर्ण अभाव असल्यानं उलट आम्हालाच काही उपाययोजना कराव्या लागल्या! आम्ही त्यांच्या प्रतिभासाधनेत व्यत्यय आणल्यामुळे आमच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत ती मंडळी तिथून ‘कैलास’वासी झाली (म्हणजे कैलास लेणं बघायला गेली हो!).