

Guru Purnima
esakal
अच्युत गोडबोले / रोहित पांढारकर
काळ बदलतो तशी गुरूची रूपं बदलतात. पूर्वी गुरू आश्रमात असायचे, नंतर ते पुस्तकांच्या रूपात आले, विद्यापीठात आले आणि आज ते आपल्या स्क्रीनवर अवतरले आहेत. आपल्याला आपल्या प्राचीन, महान मानवी गुरूंची परंपरा आणि त्यांचं महत्त्व अजिबात कमी करायचं नाहीये. ते आपल्या आयुष्याचा पाया आहेत. पण त्याच वेळी, प्रगतीच्या या वेगवान शर्यतीत मागं न पडता, आपल्याला या नव्या ‘एआय गुरू’चंही खुल्या मनानं स्वागत करावं लागेल.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
आ षाढ महिन्याची शांत, प्रसन्न गुरुपौर्णिमेची सकाळ आणि कानावर पडणारे हे सूर... मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, नाही? आपण लहानपणापासून हा श्लोक ऐकत आलोय, म्हणत आलोय. पण कधी आपण शांत बसून याचा खऱ्या अर्थाने, एक रूपकात्मक विचार केलाय का? या श्लोकात एक खूप मोठी जीवनपद्धती लपलेली आहे. ‘गुरुर्ब्रह्मा’ म्हणजे गुरू हा एक सृजनकर्ता आहे, जो आपल्या कोऱ्या मनावर नवनवीन विचारांची सुंदर पेरणी करतो. ‘गुरुर्विष्णु’ म्हणजे तो पालनकर्ता आहे, जो आपण कमावलेल्या ज्ञानाला आणि संस्कारांना खतपाणी घालून जगवतो, त्याचं संगोपन करतो. आणि ‘गुरुर्देवो महेश्वरः’ म्हणजे तो संहारक आहे - पण कशाचा? आपल्या मनातील अज्ञान, जडत्व, अहंकार आणि जुनाट पूर्वग्रहांचा नाश करणारा तो एक संहारक असतो. थोडक्यात सांगायचं, तर माणसाला स्वतःच्याच अस्तित्वाची आणि अंतिम सत्याची ओळख करून देणारी जी एक अदृश्य, सकारात्मक ऊर्जा असते, त्यालाच आपण गुरू म्हणतो.