

Indian psychology and emotional well-being
esakal
राधिका परांजपे-खाडिलकर
स्वभावातून आणि स्थायीभावांतून जन्माला आलेल्या आनंदाचं स्वरूप निखळ आणि दीर्घकालीन असतं. जेव्हा आपण स्वभावातल्या उणिवा जाणून त्यांच्यावर काम करतो, त्यांना संयमाचं, कृतज्ञतेचं आणि निस्वार्थीपणाचं रूप देतो, तेव्हा आनंदासाठी आपल्याला कोणत्याही कारणाची किंवा प्रसंगाची वाट पाहावी लागत नाही. आनंद ही केवळ एक भावना न राहता, तो आपल्या स्वभावाचा एक भाग होण्याकडे वाटचाल होऊ लागते.
मनाच्या आतून, खोलवर वाटणारा आनंद हा एखाद्या प्रसंगाचा किंवा घटनेचा परिणाम नसतो, तो आपल्या स्वभावाच्या आणि स्थायीभावांच्या सूक्ष्म परस्परसंबंधातून जन्माला येणारा एक अनुभव असतो, असं मला वाटतं. भौतिक जगात मिळणाऱ्या सुखसोयी, यश, संपत्ती, प्रतिष्ठा या गोष्टी आनंदाला हातभार अवश्य लावतात, पण आनंदाचा मूळ स्रोत आपल्या अंतर्मनातल्या स्वभावरचना आणि स्थिर भावनिक वृत्ती यांच्यातच दडलेला असतो. म्हणूनच काहीजण अत्यंत साध्या परिस्थितीतही समाधानी आणि आनंदी राहतात, तर विपुल साधनसंपत्ती असूनही काहीजणांच्या मनाला शांतता लाभत नाही.