आरोग्य सुविधांमध्ये भारताने नेत्रदीपक विकास केला आहे. मात्र, जागतिक दर्जा आणि ध्येय गाठण्यासाठी भारताला अजून बरीच मजल मारायची आहे. नवजात अर्भकांच्या मृत्यूचा दर घटला असला, तरीही अपेक्षित सहस्राब्दी उद्दिष्टे भारताने गाठलेली नाहीत.
‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे मानले जाते. घरामध्ये पाळणा हलणे हा साऱ्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. नऊ महिने पोटात वाढवून आपल्या बाळाला जन्म देणे हा मातेच्या आयुष्यातील परमोच्च आनंद असतो. परंतु, सर्वच मातांना हा आनंद गवसतोच असे नाही. ओठाशी आलेला आनंदाचा प्याला अचानक दूर लोटला जातो. बाळ मृतावस्थेत जन्मते किंवा त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे भाग्यही आई-वडिलांना लाभत नाही. अनेकदा तर बाळ पाच वर्षांचे होण्याआधीच देवाघरचे निर्माल्य ठरते.
बालमृत्यू ही जगाला भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे. बालमृत्यू म्हणजे एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बालकाचा मृत्यू होणे. दर एक हजार जिवंत जन्मांमागे होणाऱ्या अर्भकांच्या मृत्यूच्या संख्येला बालमृत्युदर (इन्फंट मॉरटॅलिटी रेट-आयएमआर) असे म्हणतात. जागतिक पातळीवर केवळ एका वर्षाच्या आतील अर्भकांचेच नाही, तर पाच वर्षांखालील बालकांचे मृत्यूदेखील बालमृत्युदरात गणले जातात.