
कौस्तुभ केळकर
संपूर्ण लग्न समारंभ आणि त्यातील विविध कार्यक्रमांदरम्यान वधू-वरपक्षांमध्ये समन्वय असेल, तर लग्नाचे उत्तम नियोजन करता येते आणि अनावश्यक खर्च टाळणे शक्य होते. लग्नखर्चात काही प्रमाणात बचत केली, तर ती रक्कम पुढील आयुष्यात उपयोगी पडू शकते.
लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर त्यांचे सहजीवन सुरू होते आणि पुढे कालांतराने त्यांचे कुटुंब तयार होते.
यातून त्यांच्या आयुष्याला एक उद्दिष्ट मिळते आणि हा प्रवास सुरू राहतो. साहजिकच लग्न ही आयुष्यातील मोठी घटना नातेवाईक, मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये साजरी करावी असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी किती खर्च करावा हा वैयक्तिक निर्णय असतो.
आजकाल लग्न समारंभ विविध पद्धतीने साजरे होतात. एखादे सभागृह घेऊन लग्न करण्याची पद्धत आता तशी जुनी झाली. हल्ली लॉनवर, मोठ्या हॉटेल्समध्ये तसेच देशात, विदेशात डेस्टिनेशन वेडिंग्ज होतात. लग्न समारंभ हा मोठा व्यवसाय झाला असून या इंडस्ट्रीचा आवाका सुमारे एक लाख कोटी रुपये एवढा प्रचंड झाला आहे.
हा व्यवसाय मिळवण्यासाठी, जगभरात पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स असणाऱ्या ओबेरॉय समूहाने त्यांच्या लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी असणाऱ्या धोरणात बदल केला आणि त्यांच्या हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये लग्नाचे कार्यक्रम होऊ लागले.