

Bulk Drug Parks and Self Reliance
esakal
भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
चीनने एपीआयनिर्मितीसाठी खास केमिकल पार्क (क्लस्टर्स) उभारले आहेत. तिथे वीज, पाणी आणि कच्चा माल सहज मिळतो. भारतात असे एकात्मिक प्रकल्प उशिरा सुरू झाले. १९९० ते २०००च्या काळात स्वस्त चिनी मालाच्या मोहापायी भारताने आपला कच्चा माल तयार करणारा उद्योग गमावला, त्याचे परिणाम आजही जाणवत आहेत.
भा रत औषधनिर्मितीमध्ये जगात आघाडीवर असला तरी, कच्चा माल म्हणजेच ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिअन्ट्सच्या (एपीआय) निर्मितीमध्ये चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा सखोल विचार करावा लागेल. १९९०पासून २०२६पर्यंत, गेली ३६ वर्षे भारत या विषयाशी झगडत आहे. स्वतःचा कच्चा माल निर्माण करून आयात मूल्य कसे कमी करता येईल, याबाबतीत स्वयंपूर्ण कसे होता येईल, याचा विचार सरकारी पातळीवर सुरूच आहे. त्यावर येत्या काळात तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने हैदराबाद, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये तीन बल्क ड्रग प्लांट्स सुरू केले आहेत. त्याविषयीची थोडी पार्श्वभूमी आणि इतिहास जाणून घेऊ या.
भारत आपल्या गरजेच्या सुमारे ७० ते ७५ टक्के एपीआय चीनकडून आयात करतो. उदाहरणार्थ, प्रतिजैविके, जीवनसत्त्वे आणि स्टेरॉइड्ससाठी लागणारा कच्चा माल. आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये भारताने सुमारे ४.३५ बिलियन डॉलर (सुमारे ४६० कोटी रुपये) किमतीची एपीआय आणि औषध मध्यस्थी (इंटरमीडिएट्स) आयात केली, त्यापैकी ७४ टक्के वाटा चीनचा होता. असे प्रचंड आयात मूल्य भारताला मोजावे लागते. यामुळे गेली ३६ वर्षे भारत मोठा आर्थिक फटका सोसत आहे. २०२०च्या सुरुवातीला चीनमधील कारखाने बंद पडल्यामुळे भारताच्या औषधनिर्मितीवर गंभीर परिणाम झाला. भारताला दुसऱ्या देशावर अवलंबून राहणे परवडणार नाही हे कळून चुकले. तसेच आपल्याला लसनिर्मिती करून सर्व देशांत निर्यात करायची असल्यामुळे आत्मनिर्भर भारत मोहीम अधिक वेगवान झाली.