

Genome Valley Hyderabad
esakal
भाग्यश्री फडके - धर्माधिकारी
औषधांच्या कच्च्या मालाच्या आयातीवरचा खर्च, वितरण व्यवस्थेचा खर्च नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधे, कच्चा माल, बायोजेनेरिक औषधे स्वतः विकसित करून भारत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. हे चित्र नक्कीच आशादायी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत औषधनिर्मिती क्षेत्रात उदयोन्मुख महाशक्ती ठरू शकेल.
मा गील लेखात (ता. २० जून) भारताला ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिअन्ट्सची (एपीआय) म्हणजेच औषधांच्या कच्च्या मालाची आयात करावी लागण्यामागची कारणे पाहिली. त्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने कोणते बदल केले आहेत आणि बल्क ड्रगची निर्मिती केंद्रे कुठे उभारली आहेत ते पाहू या. पण त्याआधी बल्क ड्रग पार्क म्हणजे काय ते समजून घेऊ. एपीआय व सक्रिय घटक तयार करण्यासाठी विकसित केलेले विशेष औद्योगिक क्षेत्र म्हणजे बल्क ड्रग पार्क. येथे सरकार सर्व सामायिक सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.
प्रत्येक कंपनीला स्वतःचा स्वतंत्र प्लांट उभारण्याचा खर्च वाचवण्यासाठी काही सोयी असतील. सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट - सीईटीपी) म्हणजेच रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वांसाठी एकच मोठा प्लांट असेल. कंपन्यांना पाइपलाइनद्वारे थेट वाफ आणि स्वस्त वीज पुरवली जाईल. औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी जागतिक दर्जाच्या लॅब्स उभारल्या जातील. कच्चा माल आणि तयार औषधे ठेवण्यासाठी मोठी गोदामे बांधली जातील, त्यामुळे साठवणूक आणि लॉजिस्टिकचा प्रश्न सुटेल. ही पार्क्स भारतात विविध ठिकाणी उभारली जात आहेत.