

Biryani Culture
esakal
आपण भारतीय लोक मुळातच खाण्याचे शौकीन! राजेशाही भारतीय मेजवानी म्हटलं, की सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर २०-२५ पदार्थांनी सजलेली भारतीय थाळी येते. पण त्या थाळीएवढीच एकटी बिर्याणीही राजेशाही वाटते. बिर्याणीमध्ये सढळहस्ते पडलेल्या साजूक तुपामुळे असेल किंवा तळून सोनेरी रंगात चमकणाऱ्या सुकामेव्यामुळे असेल, बिर्याणीला एक श्रीमंती थाट आहे!
एखाद्या ठिकाणचं खानपान म्हणजे तिथल्या संस्कृतीचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग. स्थानिक हवामान, पिकं, ऋतू या सर्वांचा या खाद्यसंस्कृतीवर प्रभाव पडतो. वंशपरंपरागत चालत आलेल्या, मागच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे सुपूर्द केलेल्या खास पाककृतींनी ठिकठिकाणची खाद्यसंस्कृती समृद्ध होते. हे ठरावीक पदार्थ अस्मितेचा भाग ठरतात, एखाद्या स्थळाला स्वतःची ओळख देतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लोकांना एकत्र आणणारी आणि कधीकधी प्रादेशिक फूटही पाडणारी गोष्ट म्हणजे मिसळ. कुठली मिसळ उत्तम यावरून परिसंवाद झडतात, मिसळीत पोहे घालणारे विरुद्ध चिवडा घालणारे असे गट पडून वादही होतात! पण मिसळप्रेम या सामायिक धाग्यानं लोक जोडलेही जातात.