

Psychology of finding inner joy
esakal
डॉ. हेमंत बा. अय्या
काहीजण मला विचारतात, ‘आनंद मानण्यात असतो का हो सर?’ अर्थातच असतो! लहानपणीची जत्रा आठवा. रंगीबेरंगी खेळण्यांची दुकानं आठवा. त्या दुकानांतले नुसते हवा भरलेले फुगे आठवा. त्या फुग्यांचं आयुष्य कदाचित एका दिवसाचंही नसेल; पण त्या फुग्याची दोरी हातात धरताना, गगनात मावणार नाही एवढा आनंद होत नसे का आपल्याला? त्या दुकानातलं एखादं प्लॅस्टिकचं खेळणं, एखादी छोटी गाडी; ज्याचा आजच्या मानाने काहीच उपयोग नव्हता; पण ती वस्तू हातात आली, की विश्व जिंकल्याचा आनंद व्हायचा. मग आज मागे वळून पाहताना प्रश्न पडतो; तेव्हा आपल्याला खरोखर आनंद होत होता की आपण तो मानून घेत होतो?
खिशास महाग झालेले कांदे अगदी दुःखी चेहऱ्यानं पिशवीत भरत असताना आनंद मला बाजारात भेटला. माझा खूप जुना मित्र! लहानपणी अगदी मस्तीत असायचा. आपल्या नावाप्रमाणे जगायचा. म्हणजे याच्या आई-बापानं जो काही विचार करून याचं नाव ठेवलेलं, ते नाव सार्थ ठरलंयच खास, असं लहानपणी याला पाहून वाटायचं. परंतु अपेक्षेप्रमाणे आनंदाला ‘दिलेलं’ नाव ‘काढता’ आलं नाही! आणि माझा मित्र आनंदचा आनंद कुठे अंधारात हरवून गेला हे कुणालाच माहीत नाही. आत्ता खरंतर त्याचं नाव वगळता, त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वात आनंदाचा अंशही बाकी राहिलेला नाहीये. तो प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करतो. भाजी महाग झाली, यंदा पाऊस व्यवस्थित झाला नाही, मुलांना परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळत नाही, मुलं सदाकाळ मोबाईलवर पडलेली असतात, बायकोनं रांधलेल्या भाजीत कधीच मीठ व्यवस्थित नसतं, माझं वजन काही कमी होता होत नाही वगैरे वगैरे अनेक समस्या. परंतु या सर्वातून निष्कर्ष हा, की आनंदाच्या जीवनातून पार पार हरवून गेलाय त्याचा आणि त्याच्यातला ‘आनंद’. मग त्याला व त्याच्यासारख्यांना पाहून वाटतंच विचारावं, ‘अरे आनंदा कुठे हरवलास?’