

Indian Wildlife Reserves and Rajput Fort Architecture
esakal
वरूण परब
जवळचे शहर : गुवाहाटी
जवळचे विमानतळ : लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी
जवळचे रेल्वेस्थानक : बारपेटा रोड
जवळचे बसस्थानक : बारपेटा रोड
केव्हा जाल? : जानेवारी ते मे
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : आसाम राज्यात, पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मंद उतारावर, जिथे पर्वत क्षेत्र संपून गाळाचा गवताळ प्रदेश आणि उष्णकटिबंधीय जंगले सुरू होतात, तिथे मानस अभयारण्य आहे. मानस-बेकी ही या भागातील मुख्य नदी असून, ती पुढे ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. या नदीवरूनच या क्षेत्रास ‘मानस’ अभयारण्य हे नाव मिळाले. ३९,१०० हेक्टर क्षेत्रफळात पसरलेले हे अभयारण्य मानस नदीच्या दोन्ही बाजूला विस्तारलेले आहे. हे अभयारण्य २,८३,७०० हेक्टरच्या ‘मानस व्याघ्र प्रकल्पा’च्या केंद्रस्थानी येते. हे अभयारण्य वाघ, एकशिंगी गेंडा, बाराशिंगा, पिग्मी हॉग, बंगाल फ्लोरिकन आणि भारतीय हत्ती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रजातींसह, अनेकविध प्रकारच्या वन्यजीवांसह भारतातील २२ अत्यंत दुर्मीळ सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचा निवारा आहे. एकूणच येथे सुमारे ६० सस्तन प्राणी प्रजाती, ४२ सरपटणारे प्राणी, ७ उभयचर आणि पक्ष्यांच्या ५०० प्रजाती आढळतात, ज्यापैकी २६ प्रजातींना जागतिक स्तरावर नामशेष होण्याचा धोका आहे. तसेच वनस्पती वैविध्यामध्ये सुमारे ८९ वृक्ष प्रजाती, १५ ऑर्किड आणि ४३ प्रकारच्या गवतांचा समावेश आहे. मानस केवळ जैवविविधतेसाठीच नाही, तर त्याच्या निसर्गरम्य देखाव्यांसाठी आणि नैसर्गिक, भौगोलिक रचनांसाठीदेखील ओळखले जाते. अभयारण्याची उत्तरेकडील सीमा भूतानच्या भव्य टेकड्यांनी वेढलेली आहे. भव्य मानस नदी, डोंगराळ जंगले आणि गवताळ प्रदेशाची शांतता यामुळे येथे अद्वितीय पर्यावरणातील सौंदर्य अनुभवायला मिळते.
जवळचे शहर : जोशीमठ
जवळचे विमानतळ :जॉली ग्रांट विमानतळ, डेहराडून
जवळचे रेल्वेस्थानक : ऋषिकेश
केव्हा जाल? : जून ते ऑक्टोबर
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या पश्चिमी भागात वसलेले हे राष्ट्रीय उद्यान ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ (फुलांची घाटी) म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक अल्पाईन फुलांसाठी आणि अतुलनीय नैसर्गिक सौंदर्यासाठी हे उद्यान ओळखले जाते. ह्या वैविध्यपूर्ण प्रदेशात आशियाई काळे अस्वल, हिमबिबट्या, कस्तुरी मृग, तपकिरी अस्वल आणि निळी मेंढी यांसारख्या दुर्मीळ आणि नामशेष होत आलेल्या प्रजाती आढळतात. इथे ७,८१७ मीटर उंच असलेले नंदादेवी हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. या उद्यानात जगातील सर्वात खोल दऱ्यांपैकी एक असलेल्या ऋषिगंगा दरीतून प्रवेश करता येतो. इथे आपल्याला उंच शिखराच्या सभोवताली हिमनद्या, मोरेन्स आणि अल्पाईन कुरणांनी तयार झालेली नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. १९८२मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यापासून या भागात मानवी हस्तक्षेप अत्यंत नगण्य असल्याने, येथील जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे.