

Government Service Delivery
esakal
व्ही. राधा, माधव गोखले - saptrang@esakal.com
सरकारच्या पातळीवर घडणारे बहुतांश प्रशासनिक काम बऱ्याचदा नजरेत फारसे ‘भरत’ नाही. सर्वार्थाने सार्थ असणाऱ्या सुधारणा, अगदी शेवटच्या स्तरावर काही बदल घडवून आणणारी कामे बहुतेक वेळा गाजावाजा करणारी नसतात. प्रशासन म्हणजे नेमके काय, ते चालते कसे, काय आव्हाने असतात ? इथं या साऱ्यांचा शोध घेत आहेत ज्येष्ठ सनदी अधिकारी व्ही. राधा आणि ज्येष्ठ पत्रकार माधव गोखले
प्रशासन नेमके काय करते? शासनाचे लोकाभिमुख असणे म्हणजे नेमके काय? प्रशासन बदलाभिमुख असते की स्थितिप्रिय अशा मुद्द्यांवर अनेकदा चर्चा झडत असतात. आम्हीही गेली बरीच वर्षे अशाच चर्चा करतो आहोत. एक अनेकविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या; सांभाळणाऱ्या शासकीय अधिकारी आणि एक पत्रकार-खळबळजनक बातम्यांच्या दुनियेत वावरतानाही भवतालात काही बरं चाललं आहे का ते शोधणारा. खरंतर प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्याच्या वेळा दुर्मीळच असायच्या, पण फोनवर बोलताना वेगवेगळे मुद्दे चर्चेत येत राहायचे - वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगळं, सकारात्मक काय घडतंय त्याबद्दल बोलणारे. घडणाऱ्या साऱ्याच गोष्टी दरवेळी फार मोठ्या असायच्याच असं नाही, पण प्रत्येक वेळी त्यात वेगळंपण जाणवायचं आणि मुख्य जाणवायचा तो लहान घटकांचा विचार. आमच्या या चर्चा थांबायच्या, मात्र नेहमीच्याच एका मुद्द्यावर - हे लिहिलं पाहिजे एकदा!