

Modern Architecture Le Corbusier and Indian Wildlife
esakal
उद्यान संवर्धन क्षेत्र
जवळचे शहर : कुलू
जवळचे विमानतळ : कुलू-मनाली विमानतळ, भुंतार
जवळचे रेल्वेस्थानक : चंडीगढ जंक्शन
केव्हा जाल? : मे ते ऑक्टोबर
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : हिमाचल प्रदेश राज्यातील हिमालयीन पर्वतरांगांच्या पश्चिम भागात वसलेले हे राष्ट्रीय उद्यान बर्फाच्छादित शिखरे, अल्पाईन कुरणे आणि नद्यांच्या काठी असलेल्या जंगलांनी नटलेले आहे. ९०,५४० हेक्टर क्षेत्रफळात पसरलेल्या या प्रदेशात अनेक हिमनद्या आणि बर्फ वितळून तयार होणारे पाण्याचे स्रोत आहेत. येथून जीवा नाल, सैंज, तीर्थन आणि पार्वती या नद्यांचा उगम होतो. त्या नद्या पुढे बियास आणि सिंधू नदीला जाऊन मिळतात. हे क्षेत्र जगातील दोन प्रमुख जैव-भौगोलिक क्षेत्रांच्या (Palearctic आणि Indomalayan Realms) संगमावर वसलेले आहे. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांतील विशेष घटक इथे पाहायला मिळतात. येथे ८०५ व्हॅस्क्युलर वनस्पतींच्या प्रजाती, १९२ लायकेन (दगडफूल), १२ लिव्हरवॉर्ट्स आणि २५ शेवाळाच्या प्रजाती आढळतात. येथील ५८ टक्के सपुष्प वनस्पती केवळ पश्चिम हिमालयातच आढळतात. येथे ३१ सस्तन प्राणी, २०९ पक्षी, ९ उभयचर, १२ सरपटणारे प्राणी आणि १२५ कीटकांच्या प्रजातींचे संरक्षण केले जाते. यामध्ये जागतिक स्तरावर दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या चार सस्तन प्राण्यांच्या आणि तीन पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. विशेषतः वेस्टर्न ट्रॅगोपान हा दुर्मीळ पक्षी आणि कस्तुरी मृग यांच्या संवर्धनासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे मोठ्या प्रमाणात इको टुरिझम आणि पर्वतारोहण होते.
जवळचे शहर : अहमदाबाद
जवळचे विमानतळ : सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद
जवळचे रेल्वेस्थानक : पाटन
केव्हा जाल? : डिसेंबर ते मार्च
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : सरस्वती नदीच्या काठी वसलेली, गुजरातमधील ही बारव (पायऱ्या असलेली विहीर) अकराव्या शतकात एका राजाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधली गेली होती. गुर्जर स्थापत्यशैली तिच्या सर्वोच्च शिखरावर असताना ह्या विहिरीची निर्मिती झाली. पाण्याचे पावित्र्य अधोरेखित करण्यासाठी या विहिरीची रचना उलट्या मंदिरासारखी करण्यात आली आहे. ही विहीर सात स्तरांच्या पायऱ्यांमध्ये विभागलेली असून इथे उच्च कलात्मक दर्जाच्या शिल्पाकृती आणि नक्षीकाम आहे. इथे भगवान विष्णूंच्या दशावताराची शिल्पे कोरली आहेत. तसेच विहिरीच्या अगदी तळाशी असलेले शेषशायी विष्णू शिल्प विहिरीला पौराणिक क्षीरसागराचे प्रतीक करते. याशिवाय सोळा श्रृंगार करणाऱ्या अप्सरा, नागकन्या आणि योगिनींची शिल्पेदेखील इथे आहेत. त्यांच्या हातातील आरसा, पायातील पैंजण आणि केसांचे रेखीव शिल्पांकन इथल्या कारागिरांचे कौशल्य दर्शविते. ८०० वर्षांपूर्वी बांधलेली ही सात मजली वास्तू आजही भक्कम उभी असण्याला विविध कारणे आहेत. भूकंपाचे धक्के सोसता यावेत म्हणून इथले दगड एकमेकांमध्ये विशेष तंत्राद्वारे गुंफले आहेत. तेराव्या शतकात सरस्वती नदीला आलेल्या पुरात ही विहीर गाळाने पूर्णपणे भरली आणि जमिनीखाली गेली. हा गाळ उपसण्यापूर्वी सुमारे ७०० वर्षे ही वास्तू जमिनीत गाडलेली होती. त्यामुळे बाहेरील हवामान, आक्रमणे आणि मोठ्या भूकंपांपासून तिचे संरक्षण झाले. १९८०च्या दशकात भारतीय पुरातत्त्व विभागाने गाळ काढून विहीर जगासमोर आणली. बारव ह्या अनोख्या स्थानिक स्थापत्यप्रकाराचे दर्शन ह्या वास्तूद्वारे होते.