

Retirement Life
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
भारतीय समाजात पंचवीस-तीस वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याची उदाहरणं अजून तरी कमी आहेत. तेव्हा आपल्याला एकत्र काळ घालवण्याची सुवर्णसंधी म्हणून या अवस्थेकडं पाहावं, हे बरं. मग जेवढा काळ दोघंही व्याधीमुक्त असतील, तेवढा काळ या सुवर्णसंधी शोधाव्यात. एकत्र नवे छंद जोपासणं, प्रवास करणं, नवीन गोष्टी शिकणं असं कितीतरी...
आपल्याला समजायला लागण्यापूर्वीच आपल्याभोवती विविध नात्यांचे गोफ गुंफले जातात. रक्ताची, मानलेली, सख्खी, चुलत, मित्रमंडळींची; जिवंत आणि निर्जीव गोष्टींशीही आपली नाती कळत-नकळत विणली जातात. नात्यांचं काहीसं ऋतुचक्रासारखंच असतं. काळाबरोबर या नात्यांचे रंग बदलत जातात आणि कधीकधी परिस्थितीनुसारही रंग बदलतात.
आयुष्याचा पूर्वरंग संपतो आणि उत्तररंग सुरू होतो, त्याची सीमारेषा धूसर असते. एकीकडं संध्याकाळचा काहीसा मोहक गोडवा आणि त्यात हुरहूर लावणारी धूसरता (ट्वायलाइट झोन). मुलांनी आपापली घरटी बांधलेली. नातवंडांची किलबिल सुरू झालेली. हवाहवासा निवांतपणा हाकेच्या अंतरावर येऊन थांबलेला! मित्रमंडळींबरोबर प्रवासाचे बेत आखलेले... म्हणून मोहक आणि तरीही आपल्यातल्या येऊ पाहणाऱ्या रितेपणामुळे, केसातल्या रुपेरी सावल्यांनी धूसर वाटणारा! आयुष्याची गाडी रूळ बदलत असते. कधी थोडा खडखडाट झाला, तर गडबडून न जाता प्रवास सुखाचा आणि आनंदाचा करता आला, तर हा उत्तररंग पूर्वरंगाएवढाच बहुरंगी नाही का होणार? या उत्तररंगाचीसुद्धा काळानुसार वेगवेगळी रंगचित्रं दिसतात.