

Women in Marathi Literature
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
पुरुषाच्या प्रगतीत, त्याच्या नैतिक चारित्र्यात स्त्रीचा वाटा फार मोठा असतो, हे संतांना ठाऊक नव्हते असे नाही. आपण समाजात ही नैतिकता पेरली नाही, तर आपल्या काव्याला काहीही अर्थ उरणार ही भीतीही या संत परंपरेला होती असेही म्हणता येईल. म्हणूनच त्यांनी आपल्या काव्याला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त व्हावे, यासाठी पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच काळाच्या रेट्यात आजही संतकाव्य विविध पैलूंसह आपल्यासमोर उभे आहे.
प्राचीन साहित्यात स्त्रियांना विशेष महत्त्व नव्हतेच. त्यांच्याकडे समाजाचा, कवींचा, किंबहुना संतांचाही पाहण्याचा दृष्टिकोन हा नगण्य स्वरूपाचा असाच होता. भारतीय पुराणात, महाकाव्यात आणि वैदिक वाङ्मयात स्त्रियांचे चित्रण पूर्वग्रहातून, दुय्यम स्वरूपातूनच आलेले दिसून येते. ती धर्माच्या नावाखाली सतत चिरडली जायची; हेच तिचे भागध्येय आहे, तिचे नशीब आहे, या सबबीवर तिला न्याय मिळणे तर सोडाच, पण तिच्याकडे साधे सहानुभूतीच्या भावनेनेसुद्धा पाहिले जात नव्हते. याला कारण आपले धर्मग्रंथ आणि त्यात मांडलेली स्त्रियांविषयीची मते. त्यामुळे प्राचीन काळापासून चालत आलेल्या या समजुतीत संतकाळातसुद्धा काहीही फरक पडला नाही. महानुभाव पंथांचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी ‘चित्रीची स्त्री न देखावी’ असे आपल्या साधकांना सांगतात. स्त्री ही मोक्षाच्या वाटेवरची धोंड आहे, ती पुरुषाला त्याच्या ध्येयापासून दूर सारणारी आणि त्याला मोहात गुंतवणारी आहे अशा स्वरूपाचे विचार तत्कालीन महापुरुषांच्या मनात कायमचे पक्के बसले होते. थोडक्यात त्या काळात स्त्रीला कोणतेच महत्त्व नव्हते. महत्त्व सोडाच, तिचा एक माणूस म्हणून कधीच विचार होत नव्हता. हे चित्र संत साहित्याच्या काळातसुद्धा असेच होते. वैदिक काळात लोपामुद्रा, गार्गी आदी स्त्रियांनी वैदिक वाङ्मयात आपला सहभाग नोंदविला होता, असे उल्लेख आपण वाचतोच. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यात्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वासत्राफलाः क्रियाः ।।’ जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात, आणि जिथे स्त्रियांचा अपमान होतो तिथे केलेली सगळी चांगली कर्मे व्यर्थ जातात, असा याचा साधा अर्थ आहे. स्त्रीचा गौरव त्या काळी केला गेला आहे, किंवा महानुभाव संप्रदायातसुद्धा महदंबा, आबाईसा आदी कवयित्री होत्या. मराठी संत काव्यातसुद्धा संत जनाबाई आणि संत मुक्ताबाई या संत कवयित्री प्रारंभीच्या काळी होऊन गेल्या. तरीसुद्धा त्या काळी संत साहित्यात किंवा समाजातसुद्धा स्त्रीविषयीचा दृष्टिकोन कमालीचा अनादरयुक्त होता. हा दृष्टिकोन तेव्हाच जनमानसात होता असे नाही, तर तो संत तुकारामांच्या काळापर्यंत तसाच कायम होता -
स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥
असे म्हणणारे संत तुकाराम किंवा
स्त्रीकामें प्रपंचु सबळ । स्त्रीकामें दुःख प्रबळ ।
स्त्रीकामें मायेसी बळ । स्त्रीकामें मोहिलें जग ।।
असे म्हणणारे संत एकनाथ हे याच संत परंपरेतले.