

Sant Namdev Poetry
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेव त्यांच्या अभंगांत काव्यगत संवेदनांचा वापर अधिक प्रभावीपणे करताना दिसतात. काव्याची रचना करताना रचनाकाराच्या किंवा कवीच्या अंगी ऋजुता असणे गरजेचे असते. कारण त्या ऋजुतेतूनच (काव्याला किंवा निर्मितीला) शरण जाणे हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे, असे दिसते. गौळणी, विराणी, भूपाळी, काकडआरती, शेजारती, भारुड, दृष्ट (स्त्रीगीत), भ्रमरगीत असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले असले, तरी शेवटी त्यातून त्यांना हवा असणारा भाव हाच महत्त्वाचा वाटतो.
संत नामदेव भावकवी म्हणून ओळखले जातात. भावकवितेचा अर्थ भावजीवनातील अनुभव काव्यातून मांडणे असा घेतला जातो. मराठी संतकाव्यात तर पहिल्या पर्वावरच संत नामदेवांनी आपल्या काव्याला आत्मानुभूतीचा आधार दिला होता. या आत्मानुभूतीचा संबंध संतकाव्यात देवत्वाचा अनुभव असाही घेतला जातो. या अनुभवला आध्यात्मिक किंवा पारलौकिक अनुभवाची मुख्य जोड असते. किमान मराठीत आधुनिक काव्याची सुरुवात होईपर्यंत, म्हणजेच कवी केशवसुतांच्या कवितेचा उदय होईपर्यंत तरी भावकवितेचा संदर्भ भक्तिकाव्याशीच जोडला गेला होता. तोपर्यंत काव्यात लौकिक किंवा सांसारिक अनुभव मांडायची मुभा कवींना दिली गेली नव्हती, आणि तरी तो अनुभव मांडायचाच झाला तर तो भक्तीच्या, ईश्वरोपासनेच्या किंवा मिथकातील रूपकाच्या अवगुंठनातच मांडला जायचा. संत नामदेवांच्या किंवा त्यांच्या आधीच्या कवींच्या वाट्याला आलेले अनुभव याच प्रकारचे होते.