

Sant Namdev Abhang Tradition
esakal
मुक्तछंदात्मक काव्यलेखनाकडेच कवींचा ओढा अधिक असतो. अलंकारादी रचनेकडे (काही अपवाद) नव्वदोत्तर कवी मुळी जातच नाहीत. त्यापेक्षा काही प्रसंगोपात्त असे गीतलेखन केले जाते; सॉनेट, शर्दूलविक्रीडीत, वसंततिलका (विशेषतः ग्रेस यांची कविता) इत्यादी रचनाबंधात मधल्या काळात कविता लिहिली जायची. मधे तिचा रचनाबंध हायकूपर्यंत, चारोळीपर्यंत विस्तारला. काव्यरचनेचे असे बदल होत असताना अभंग हे वृत्त मात्र आजसुद्धा त्याच स्वरूपात कायम आहे.
संत नामदेवांनी आपल्या हयातीत जी विपुल आणि वैविध्यपूर्ण अशी काव्यरचना केली त्यामागे नक्कीच काही महत्त्वाच्या ग्रंथांचा आधार असू शकतो; किंबहुना तो असावाच याचा प्रत्यय येतो. कोणत्याही प्रतिभासंपन्न कवीच्या बाबतीतसुद्धा अशाच पूर्वसुरींच्या संचिताचा आधार असतोच असतो. त्या संचितावर उभे राहत प्रत्येक कवी किंवा सर्जनशील लेखक आपली निर्मिती करीत असतो. संत नामदेवांच्या बाबतीतसुद्धा हे सत्य नाकारता येत नाही. त्या सत्याचा विचार येथे करता येईल.
याबाबतीत संत नामदेवांच्या लेखनाचा विचार करावयाचा झाला, तर त्यांच्या काव्यलेखनामागे कोण्या एका संतांचा किंवा ग्रंथांचा विचार करता येत नाही. तर सगळी भारतीय परंपराच एक मोठे संचित घेऊन उभी असल्याचे दिसते. त्यात वेद आहेत, उपनिषदे आहेत, आरण्यके आहेत, विविध भक्तिसंप्रदाय-पंथ आहेत, रामायण आणि महाभारतादी महाकाव्ये आहेत, पुराणे आहेत, शंकराचार्यांचा तत्त्वविचार आहे. हे सगळे प्रवाह त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे येऊन मिळाले आहेत. या प्रवाहांमुळे त्यांच्या मुख्य प्रवाहाला - विठ्ठलभक्तीला, विठ्ठलोपासनेला कुठलीही बाधा येत नाही. उलट तो मुख्य प्रवाह अधिक बळकट होत जातो, आणि वारकरी संप्रदायाच्या प्रारंभीच एक महत्त्वाची वाट दाखवीत आपला प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर भारतातसुद्धा अधिक ठळक करतो, हे नाकारता येत नाही. वारकरी संप्रदायाचे मुख्य संत नामदेव - एकनाथ - तुकाराम यांचा विचार करता, या उर्वरित दोन्ही संतांनी नामदेवांपासून घेतलेले काव्यप्रवाह, काव्यविचार, भक्तिमार्ग, आत्माविष्कार आणि रचनासौंदर्य पुढील कित्येक पिढ्यांना परिपुष्ट करणारे आणि मार्गदर्शक ठरले आहे. म्हणून संत नामदेवांच्या काव्यरचनेमागे असलेले स्रोत समजून घ्यावे लागतात.