

Sant Namdev Literature
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
श्रीनामदेव गाथेत संत नामदेवांनी लिहिलेली इतर अनेक संतांची चरित्रे समाविष्ट केलेली आहेत. अर्थात ही सगळी चरित्रे संत नामदेवांनी रचलेली आहेत का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या चरित्रांचा विचार करावयाचा झाला तर ही चरित्रे संत नामदेवांनी सलगपणे किंवा म्हटले तर जाणीवपूर्वक लिहिली आहेत असे म्हणणे काहीसे कठीण होईल.
सं त नामदेवांनी साहित्याच्या अनेक प्रकारांना आपल्या काव्यातून लीलया अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न म्हणण्याऐवजी ते त्यांच्या काव्यातून सहजपणे घडत गेले. यातूनच मग आत्मचरित्र, चरित्र, प्रवासवर्णन, भावकाव्य, भक्तिकाव्य असे अनेक प्रकार त्यांच्या काव्यात सामावत गेले. आज आपण या प्रकारांसाठी गद्य लेखनाचा आधार घेत असतो, त्या काळी पद्यलेखनाचाच एकमेव पर्याय सगळ्यांच्या समोर होता. मौखिक परंपरेत काव्यरचना हाच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने एकमेव सोयीचा मार्ग होता; पण या काव्याच्या आकृतिबंधात जगातील केवढे मोठे अक्षरवाङ्मय निर्माण झाले! मराठी संतांनीसुद्धा तत्त्वज्ञानापासून भावकाव्यापर्यंत आणि लोककाव्यापासून भक्तिकाव्यापर्यंत केलेली साहित्यनिर्मिती पाहिली, की आपले जगणे या संतांनी किती समृद्ध करून ठेवले आहे, याची साक्ष पटते. आपली ही श्रीमंती ज्यांनी ज्यांनी वाढवली त्यात संत नामदेव आणि संत ज्ञानदेव व पुढे संत तुकाराम हे महत्त्वाचे संत ठरतात.