

Sant Namdev Literary Legacy
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेवांच्या रचनांतून त्यांच्या प्रतिभेतील हळुवारपण, कल्पकता, भावात्मकता आणि अभ्यास यांचा प्रत्यय अभ्यासकांना, रसिकांना आल्यावाचून राहत नाही. पुराणांचा अभ्यास केल्याशिवाय ही उत्कटता काव्यात येणे अशक्य आहे हेही पटते. संत नामदेवांची नाळ भागवत या ग्रंथाशी अधिक उत्कटत्वाने जोडली गेली आहे, याचे पुरावे त्यांच्या या स्वरूपाच्या लेखांतून वारंवार मिळतात.
संत नामदेवांनी जी विविध प्रकारची काव्यरचना केली ती पाहता त्यांचा पिंड कसा घडत गेला, त्यांच्यावर पूर्वसुरींचा प्रभाव कसा पडत गेला, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. संत नामदेवांचा आणि संत ज्ञानेश्वरांचा कालखंड एकच होता. दोघांच्याही लेखनाचा काळसुद्धा एकच होता. दोघांनीही आपल्या लेखनाचा प्रारंभ एकाच वेळी केला. फरक एवढाच की संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लेखनाला प्रारंभ केला आणि ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ रचला, तर संत नामदेवांनी वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वर्षी काव्यलेखनाला प्रारंभ केला असावा. कारण जेव्हा दोघांचीही भेट झाली, तेव्हा संत नामदेव कीर्तनकार आणि संतकवी म्हणून प्रसिद्ध झाले होते, तर संत ज्ञानेश्वर भगवद्गीतेचे भाष्यकार म्हणून मान्यता पावले होते. म्हणजे अवघ्या दोन वर्षांत या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाची चर्चा, महती सर्वतोमुखी झाली होती. संत ज्ञानेश्वरांचा पिंड घडायला त्यांचे गुरू निवृत्तिनाथ महत्त्वाचे ठरतात. तर इकडे संत नामदेवांचे व्यक्तिमत्त्व घडायला कोण पूरक ठरले, हा प्रश्न समोर येतोच. कारण ते आपल्या गुरूकडे, विसोबा खेचरांकडे जातात तेच मुळी निवृत्तिनाथ आणि मुक्ताबाईच्या सल्ल्याने किंवा सूचनेने. आणि तसे पाहता संत नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत विसोबा खेचरांना फारसे श्रेय देता येणार नाहीच. कारण विसोबा खेचर आणि संत नामदेवांची भेट झाली त्याआधीच संत नामदेवांची कीर्तनकार आणि ज्ञानी पुरुष म्हणून प्रतिमा निर्माण झाली होती. प्रसिद्धीच्या वलयामुळे संत नामदेवांच्या अंगी अहंकार आलेला आहे आणि त्यामुळेच संत मुक्ताबाई त्यांना, ‘अखंड जयाला देवाचा शेजार । का ते अहंकार नाही गेला...’ अशी अहंकाराची जाणीव करून देते (यावर आधीच आक्षेप घेतला आहे; पण संत नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या भेटीच्यावेळी संत नामदेवांची प्रतिमा समाजमनात कशी निर्माण झाली होती, याचा हा दाखला देता येईल), आणि म्हणून त्यांच्या आयुष्यातील विसोबा खेचर हे प्रकरण नगण्य वाटण्याइतके ते अनुल्लेखनीय आहे.