

Sant Namdev Maharaj and the Bhakti Movement
esakal
श्रीहरी महाराज नामदास, वशंज, संत नामदेव महाराज
वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांनी भक्तीला समाजजीवनाशी जोडणारे महान कार्य केले. श्रीक्षेत्र पंढरपूर ही त्यांची कर्मभूमी आणि विठ्ठलभक्तीचे केंद्र होते. नामदेव महाराजांनी भक्तीचा प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता उत्तर भारत, पंजाब, राजस्थानसह अनेक प्रदेशांत केला. त्यांच्या नामस्मरणाच्या संदेशामुळे समाजातील सर्व जाती-जमातींना भक्तीचा समान अधिकार मिळाला, म्हणूनच वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराजांसोबत संत नामदेव महाराजांचे स्थान अत्यंत मानाचे आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आज जे नामदेव मंदिर प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांनी श्री केशवराज देवाची मूर्ती स्थापित केली, अशी परंपरा सांगितली जाते. दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीविठ्ठल त्या ठिकाणी आले असता, ‘तू माझ्यापाशी इथेच उभा राहा’ अशी प्रार्थना नामदेव महाराजांनी केली. ‘नामा म्हणे केशीराजा, केला नेम चालवे माझा’ या अभंगातील भावार्थ या परंपरेशी जोडला जातो. संत नामदेव महाराज यांच्या मातोश्रींनी श्रीविठ्ठलाला केलेल्या नवसामुळे त्यांचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. ‘शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला’ या अभंगांमधून त्यांनी आपले पंढरपुराशी असलेले नाते व्यक्त केले आहे.