

Literary Excellence of Sant Namdev
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत ज्ञानेश्वरांनी आणि संत नामदेवांनी आपल्या काव्यातून अलंकारांचा, रसांचा उपयोग करून मराठी संत साहित्याला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्याच्या लेखनाला काळाच्या मर्यादा कधीच पडल्या नाहीत. उलट काळाच्या मर्यादा ओलांडून ते कालातीत ठरले. या काव्याचे प्रयोजन जरी विठ्ठलभक्ती असले, तरी त्या प्रयोजनाच्या पलीकडे काव्याच्या सगळ्याच शक्यतांवर ते काव्य अतिशय श्रीमंत म्हणून उभे राहते.
आपण संत नामदेवांचा संत म्हणून, विठ्ठलभक्त म्हणून प्राधान्याने विचार करतो; पण त्यापेक्षाही ते प्रतिभासंपन्न कवी होते, काव्यशास्त्रातील अनेक संकेत, अलंकार, वृत्त इत्यादींचे त्यांना मुळात ज्ञान होते. त्यांचा उपयोग आपल्या काव्यात कसा करून घ्यायचा, कोणत्या अलंकाराच्या वापराने आपल्या काव्याला किंवा त्या त्या प्रसंगाला अधिक उठाव मिळेल, काव्यदृष्ट्या आपली रचना कशी अधिक प्रगल्भ आणि परिपुष्ट होईल, याचा विचार ते अधिक गांभीर्याने करीत होते. वर वर भक्त, कवी म्हणून समाजात ओळख असणाऱ्या संत नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वात एक अभिजात कवी, शब्दप्रभू वसला होता. त्यामुळेच भक्त किंवा कीर्तनात वावरणाऱ्या संत नामदेवांपेक्षा कवी म्हणून ते अधिक प्रभावी होते. सरस होते. म्हणूनच त्यांची कोणतीही रचना घेतली, तरी ती या तीन उद्दिष्टांपैकी कोणत्या तरी एका किंवा एकापेक्षा अधिक उद्दिष्टांची पूर्ती करणारी असल्याचे लक्षात येते.