

Identity Conflict of Saint Namdev
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेवांचे हिंदी अभंग आहेत, ते त्यांचा महाराष्ट्राबाहेर प्रवास सुरू झाल्यानंतरचे आहेत, हे स्पष्ट होते. या काळात, म्हणजे प्रवासादरम्यान त्यांचे मराठी अभंग आहेत का, याचा शोध घेणे कठीण होऊन बसते. एकीकडे तीर्थावळीचे अभंग, तर दुसरीकडे एकदम हिंदी अभंग असाच हा प्रवास समजून घ्यावा लागेल. याच संभ्रमाला समोर ठेवून काही अभ्यासकांनी पंजाबातले नामदेव हे दुसरेच होते, ते मराठी प्रांतातले नामदेव नाहीत, असाही विचार साधार मांडला आहे. संत नामदेव एक की दोन की अनेक हा वाद आधीपासूनच चर्चिला जातो आहे.
संत नामदेव महाराज पंजाबात कधी गेले आणि ते कोणत्या मार्गाने गेले याविषयी स्पष्ट उल्लेख खुद्द त्यांच्याही काव्यात आढळून येत नाही. त्यामुळे फक्त ‘संत नामदेव पंजाबात गेले’ एवढ्याच एका सत्याचा विचार आपण करू लागतो. पंढरपूर ते घुमान या गावापर्यंतचा हा प्रवास इतका सोपा नव्हताच. या अंतराचा जरी विचार केला, तरी (आजच्या नकाशानुसार व मार्गानुसार) जवळजवळ दोन हजार किलोमीटरचे हे अंतर आहे. आपण साधा हिशोब करू. एक व्यक्ती (साठीला आलेली) दररोज पंचवीस किलोमीटर एवढे अंतर चालत असेल तर आणि दररोज प्रवास केला तर किमान ८० दिवस लागतात. वयाच्या ऐंशीव्या वर्षी चालण्याचा हा वेग अधिकच कमी झालेला असणार. मधेच थकवासुद्धा जाणवू लागेल. याचाच अर्थ या प्रवासालाच किमान तीन ते चार महिने लागू शकतात आणि हा सलग प्रवास नसेल, तर काही महिने किंवा काही वर्षे तरी लागतील असा प्राथमिक अंदाज लावता येईल.