

Indian Heritage Education and Military Architecture :
esakal
वरूण परब
शांतिनिकतेन
जवळचे शहर : बोलपूर
जवळचे विमानतळ : नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता
जवळचे रेल्वेस्थानक : बोलपूर (शांतिनिकेतन)
केव्हा जाल? : ऑक्टोबर ते फेब्रुवारी
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणारे हे शैक्षणिक संकुल. शिक्षणमहर्षी रवींद्रनाथ टागोरांनी भारतीय गुरुकुलपद्धतीचा शैक्षणिक महाप्रयोग येथे साकार केला. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी १८६३च्या सुमारास हा विस्तृत परिसर खरेदी करून ध्यानधारणेसाठी तेथे ‘शांतिनिकेतन’ नावाचे एक कुटीर बांधले. पुढे रवींद्रनाथांनी या ठिकाणाचे शिक्षण आश्रमात रूपांतर केले. त्यांनी २२ डिसेंबर १९०१ रोजी येथे पहिली खुली आश्रमशाळा सुरू केली. भारतातील तरुणांमध्ये वाढीस लागलेली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती रवींद्रनाथांना मान्य नव्हती. अंधानुकरणामुळे आपली स्वतःची चिकित्सक बुद्धी अविकसित राहते, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी विविध विद्या-कलांच्या अध्यापनाचे अनेक अभिजात उपक्रम आणि प्रयोग केले. त्यातील शांतिनिकेतन हा सर्वात यशस्वी प्रयोग मानला जातो. शांतिनिकेतन येथे विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि आनंद मिळेल, विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाची आणि स्वावलंबनाची भावना निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यात आले. शांतिनिकेतनच्या उभारणीत रवींद्रनाथांनी सी. एफ. अँड्रयूज आणि पिअर्सन या दोन शिक्षणतज्ज्ञांचे साहाय्य घेतले. डिसेंबर १९२१मध्ये रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन येथील शाळेचे ‘विश्वभारती’ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात रूपांतर केले. अभ्यास आणि संशोधन या माध्यमांद्वारे पूर्वेकडील देशांच्या संस्कृतींची एकात्मता साधणे, हे विश्वभारतीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या परिसरात शांतिनिकेतनबरोबरच सिन्हा सदन, स्वातंत्र्यसैनिकांची बैठकीचे ठिकाण अमर कुटीर, सोनाझुरीचा बाजार अशा वास्तू आहेत.