

Shravan in Marathi Literature
esakal
प्रणव बापट
कुसुमाग्रजांचा श्रावण तितकाच मनोहारी. भाषाप्रभू कुसुमाग्रजांनी श्रावणाला ‘हासरा, लाजरा, साजिरा, खेळकर’ अशी विशेषणं जोडून मुळात सुंदर असलेल्या श्रावणाचं सौंदर्य अजूनच अधोरेखित केलेलं आहे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे श्रावण खरोखरच ‘आनंदाचा धनी’ असल्याची जाणीव त्यांची कविता वाचताना आपल्याला होते. याच आनंदस्वरूप श्रावणाला कवयित्री शांता शेळके आपल्या ‘ऋतू हिरवा’ या रचनेत मनभावन, प्रिय साजण म्हणून संबोधतात.
श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर ती एक अतिशय ऋतुसुंदर भावना आहे. श्रावणातला पाऊसकाळ हा सृजनाचा काळ. श्रावण महिन्यात संपूर्ण सृष्टी सृजनाच्या नानाविध आविष्कारांना उत्स्फूर्तपणे सामोरी जात असते. सृजनाचे हे सोहळे मराठी साहित्यातल्या सिद्धहस्त हातांनी आपापल्या परीने शब्दांत उतरवले नसते तरच नवल. दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या ऋतुचक्र या पुस्तकातला प्रत्येक लेख हा केवळ एक लेख नव्हे, तर ते त्या त्या ऋतूचं एक अतिशय तरल, भावपूर्ण आणि सूक्ष्म निरीक्षणातून साकारलेलं एक सुंदर शब्दचित्र आहे, असं मला वाटतं. कारण त्यातला कोणताही लेख वाचत असताना तो ऋतू अंगावर पांघरून घेतल्याची जाणीव सतत होत राहते. खरंतर या पुस्तकातले सगळेच लेख वाचल्यावर आपल्या शहरी जीवनातदेखील आजूबाजूला दिसणाऱ्या त्या त्या ऋतूच्या ऋतुखुणा टिपून घेणारी नजर आपल्याला लाभते. त्यातलाच ‘श्रावणसाखळी’ हा लेख म्हणजे आपल्या जाणिवा-नेणिवा जागृत ठेवून दुर्गाबाईंच्या नजरेतून त्यांनी साकारलेलं श्रावणाचं अतिशय देखणं ऋतुचित्र आहे. दुर्गाबाईंप्रमाणेच श्रावण या महिन्याने विविध मराठी साहित्यिकांना कायम भुरळ घातलेली आहे. मराठी कवितांना या महिन्यानं अनेकानेक अर्थांनी समृद्ध केलेलं आहे. खरंतर श्रावण म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारा पाऊस, ऊन-पावसाचा खेळ, इंद्रधनुष्य, नानाविध रंग, ढगांचे आकार या गोष्टी सगळ्यांना सारख्याच दिसत असल्या, तरी लिहिणाऱ्या प्रत्येक हाताला आणि प्रत्येक लिहित्या मनाला त्यात काहीएक नावीन्य सापडल्याचं आपल्याला वाचताना जाणवतं. मराठी कविता आणि श्रावण यांच्याकडे एकत्र पाहताना मला पहिला आठवला तो बालकवींचा, अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा श्रावण.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे