

Pandharpur Shri Ramkabir Math
esakal
भागवत विष्णूमहाराज कबीर
पंढरपुरातील श्रीरामकबीर मठ हे केवळ एक धार्मिक केंद्र नसून, संत श्रीकबीर, श्रीकमाल महाराज आणि वारकरी परंपरेतील अखंड भक्तिरसाचे उज्ज्वल प्रतीक आहे. रामानंदी आणि वारकरी संप्रदायांचा सुंदर संगम जपणाऱ्या या मठाने अनेक पिढ्यांपासून नामभक्ती, कीर्तन, प्रवचन आणि संत परंपरेचे संस्कार जतन करत समाजाला अध्यात्माचा मार्ग दाखविण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
पं ढरपूर ही संतभूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीला अनेक संतांचे पवित्र वास्तव्य लाभले असून, त्यांच्यामुळे भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. अशाच पवित्र वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचे स्थान म्हणजे श्रीरामकबीर मठ अथवा श्रीकबीरमठ फड. प्राचीन ग्रंथांमध्ये संत कबीर महाराज हे श्रीजनाबाईंच्या भेटीसाठी पंढरपूरला आल्याचे उल्लेख आढळतात. कबीर महाराजांच्या निर्याणानंतर त्यांचे पुत्र आणि सत्शिष्य असलेल्या श्रीकमाल महाराजांनी पंढरपूर येथे येऊन कायमचे वास्तव्य केले. त्यांच्या परंपरेत अनेक अधिकारी महंत होऊन गेले. प्रत्येकाने भक्तीचा अखंड प्रवाह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आणि भागवत धर्माची पताका उंचावण्याचे कार्य केले.