

Emotional Journey to Childhood Home
esakal
आमच्या वाड्यानं बहुतेक कुटुंबांतली सुख-दुःखं बघितली, चढ-उतार बघितले. सगळ्यांना सामावून घेतलं. अनेकांच्या पंखांना बळ दिलं. उद्या कदाचित वाडा जमीनदोस्त होऊन तिथं एखादी टोलेजंग इमारत उभी राहील, ती नवीन नावानं ओळखली जाईल, वाड्याचं अस्तित्व पुसलं जाईल, पण जिथं आम्ही जन्मलो, वाढलो आणि घडलो तो वाडा मनातून कसा जाणार? त्यानं आमच्या मनात कोरलेलं घर कायम आमच्याबरोबरच राहणार, नाही का?
खरंतर वाडा सोडून आज जवळपास चाळिसेक वर्षं झाली असतील. पण आताच वाड्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे, ज्या गल्लीत आम्ही भाडेकरू म्हणून राहत होतो तो वाडा असलेल्या भागात काही कारणानं जाण्याची वेळ आली. अनेक वर्षांनी त्या भागात गेल्यानं तिथं झालेला बदल बघत बघत गल्लीत शिरलो. एकेकाळी छोटी असलेली ‘गल्ली’ आज मोठी गजबजलेली बाजारपेठ झाली होती. त्या मार्केटच्या गर्दीतून वाट काढत वाड्यापर्यंत पोहोचलो. आम्ही राहत असलेला आणि माझ्या डोळ्यासमोर असलेला हा ‘तो’ वाडा नव्हता. गल्ली आता छोट्या-मोठ्या दुकानांनी व्यापली होती आणि रस्ते माणसांनी, वाहनांनी वाहत होते. रस्त्याच्या कडेला सर्वत्र दुचाकी वाहनं होती. इतर मोठी वाहनं गल्लीत शिरूच शकत नव्हती. ह्या सगळ्या वातावरणात आमचा वाडा खरोखरच झाकला गेला होता. ह्या सर्व गोष्टींमुळे वाडा शोधायला वेळ लागला. वाड्याच्या बऱ्याच जुन्या खुणा आता शिल्लक नव्हत्या. पण काही तशाच होत्या, त्यामुळे वाड्यात प्रवेश करू शकलो.