

Sant Namdev-Muktabai controversy
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
मुक्ताबाई या संत परंपरेत अभिमान बाळगावा अशा कवयित्री असताना त्यांनी संत नामदेवांविषयी असे अनादरयुक्त उद्गार का काढले असावेत? आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी ज्येष्ठ असणाऱ्या आणि कीर्तनकार व विठ्ठलभक्त म्हणून लौकिकप्राप्त व्यक्तीला अशाप्रकारे दूषणे देणे मुक्ताबाईच्या व्यक्तिमत्त्वाला उणेपणा आणत नाही काय? बरे, आपल्यापेक्षा मोठ्या व गुरू असलेल्या भावांचेही त्यांनी ऐकू नये?
संत नामदेवांच्या चरित्रातील गुरुबोधाचे प्रकरण पाहत असताना त्यातील काही गोष्टींचा, समज-अपसमजांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक अभ्यासकांनी आपापली मते मांडून त्यांच्या या गुरुबोधाच्या बाबतीत आपले विवेचन, अनुमान काढले आहे. शंकाही उपस्थित केल्या आहेत. येथेही त्याच अनुषंगाने काही विचार, शंका मांडणे गरजेचे वाटते.
पहिला मुद्दा समोर ठेवायचा, तर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट. ती नेमकी आळंदीला झाली की पंढरपुरी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. दुसरा मुद्दा किंवा शंका घ्यायची, तर संत नामदेव निवृत्तिनाथादी भावंडांना भेटतात तेव्हा मुक्ताबाईने काढलेले उद्गार. मागील विवेचनानुसार एका गोष्टीची पुन्हा येथे पुनरावृत्ती करणे इष्ट ठरेल. नामदेवांच्या कालखंडाचा विचार करता त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनांकडे, प्रसंगांकडे पाहताना कोणता आधार घ्यायचा याचा विचार करता फारसे काही हातात येत नाही. येते ते मग काही मौखिक परंपरेने, काही अपुऱ्या साधनांनी, तर काही त्या त्या संतांचे हाताशी असलेले लेखन समोर ठेवून. कारण इतक्या काळानंतर ठोस असे पुरावे हाताशी येणे कठीण कर्म ठरते. शिवाय त्यात अनेक शंका घ्यायला जागा उरतेच. हाच विचार करता संत मुक्ताईने संत नामदेवांच्या संदर्भात काढलेले उद्गार किती खरे समजायचे, हा प्रश्न पुन्हा पडतोच. कारण मुक्ताबाईच्या मुखातून असले उद्गार निघणे म्हणजे तिच्या व्यक्तिमत्त्वाला, जनसामान्यातील तिच्या प्रतिमेला बाधा आणणारे ठरते.