

Public health policy and administration
esakal
राज्य सरकारने नुकतीच आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी मोठ्या योजनेची आखणी करून त्यासाठी भरीव स्वरूपाची तरतूद केली आहे. गाव पातळीपर्यंत ठोस नियोजन करून आरोग्यदायी महाराष्ट्र कसा घडेल, याचा विचार या योजनेत करण्यात आला आहे. महात्मा गांधींनी कायम खेड्यांकडे चला असे सांगितले होते. त्याचा सूक्ष्म अर्थ गावपातळीपर्यंतचे नियोजन करा असा होता. कोरोना महासाथीच्या काळात आख्ख्या जगाने या साथीमुळे बऱ्याच गोष्टी सहन केल्या. या शतकामध्ये तरी कोरोनापूर्वीचा काळ आणि कोरोनानंतरचा काळ अशी थेट विभागणी आता करण्यात आली आहे. कोरोनानंतर ‘न्यू नॉर्मल’ असा एक शब्दप्रयोग वापरात आला. याचे कारण म्हणजे आरोग्याचा विचार एकपदरी करून चालणार नाही हे सगळ्यांच्याच लक्षात आले. राज्य सरकारच्या या नव्या योजनेत आरोग्यसंपन्न राज्यासाठी चतुःसूत्रीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनशैली, उपचारासाठी तातडीने हालचाली, पुनर्वसन आणि चौरस आहार याचा विचार करण्यात आला आहे. निरोगी राहण्यासाठी या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही राहत आहात त्या गावात तुम्हाला आरोग्यदायी वातावरण कसे मिळेल याचा विचार केलाच पाहिजे, याचबरोबर जो आहार तुम्ही घेता, तो प्रदूषणमुक्त आणि कुठल्याही रसायनांपासून मुक्त असायला हवा. या दोन गोष्टींनंतर आजार झाला, तर त्यावर तातडीने उपचाराची सोय होणे गरजेचे आहे. मुळात आजार होऊ नये यासाठी योग्य वातावरण तयार करणे महत्त्वाचे असते. त्याचा विचार राज्य शासनाने या योजनेत केला आहे, हे कौतुकास्पद आहे.