

Evolution of Bhakti Movement in Maharashtra
esakal
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करणारा कोणताही मोठा संत नसताना केवळ संत नामदेवांच्या शिष्यगणांनी पुढे संत एकनाथांच्या उदयापर्यंत वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म चिकाटीने टिकवून ठेवला. या संतमेळ्याने व्यक्तिगत पातळीवर काहीही दुजाभाव न करता, जातीभेद न मानता बहुजन समाजातील सगळ्या संतांना विठ्ठलभक्तीचे दरवाजे खुले करून दिले. संत नामदेवांनी घालून दिलेला भक्तीचा पाया इतका भक्कम होता, की त्यांच्या वीस वर्षांच्या अनुपस्थितीतच नव्हे, तर पुढे त्यांच्या समाधीनंतरसुद्धा दीडशे वर्षे हा भक्तीचा मळा सतत फुलतच होता.
पंजाबात वीस वर्षे काढल्यानंतर संत नामदेव पुन्हा पंढरपुरी आले आणि त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी पंढरपूरला समाधी घेतली असे त्यांच्याविषयी सांगितले जाते. त्यांचा समाधीकाळ इ.स. १३५० असा दर्शविला आहे. या काळात त्यांचे वय ऐंशी होते. म्हणजे ऐंशीव्या वर्षी ते पंजाबातून म्हणजेच घुमान या गावातून महाराष्ट्रात पंढरपुरी आले तेव्हा थकलेले असणार. त्यांचे समकालीन संत या काळापर्यंत काळाच्या पडद्याआड गेलेले होते. संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे बंधू तर त्यांच्या नजरेसमोरच समाधिस्थ झाले होते. संत सावता माळीसुद्धा त्याच दरम्यान (१२९५) देवाघरी गेले होते. संत गोरा कुंभार (१३१७), संत नरहरी सोनार (१३१३), संत जोगा परमानंद (१३३८), संत चोखामेळा (१३३८), संत जनाबाई (१३५०) आदी नामदेवकालीन संत त्यांच्या परतीच्या प्रवासापर्यंत काळाच्या पडद्याआड गेले होते. नामदेवांचे काही शिष्य परिसा भागवत, राका कुंभार, जोगा परमानंद, संत बंका महाराज आदी संतांविषयी पुरेशी आणि विश्वासार्ह अशी माहिती मिळत नाही. पण हे संतसुद्धा त्यांच्या समकालीनच होते. इ.स. १३५०नंतरच्या संतांचा विचार करता, एकनाथांपर्यंत (इ.स. १५०४-१५९९) म्हणजे जवळजवळ दीडशे वर्षे मोठ्या संतांची परंपरा महाराष्ट्रात दिसत नाही. आणि तरीही वारकरी संप्रदाय अव्याहतपणे सुरू राहिला. त्यात खंड पडला नाही. अर्थात ही वारकरी संप्रदायाची अंगभूत असलेली विजिगीषू वृत्ती व सामर्थ्य होय, हे नाकारता येत नाहीच.