

Childhood Summer Memories
esakal
प्रभाकर बोकील
उन्हाळ्याच्या सुट्टीत आठवडाभर भोरला आजोळी राहिल्याची आठवण आजही ताजी आहे. ‘जेथे दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती’ अशी सुभाषितं भिंतींवर असलेल्या आजोबांच्या घरामागच्या परसात डावीकडच्या बाजूला साठवणीची खोली होती, ती प्रसंगी बाळंतिणीची खोली असायची. त्या खोलीत सीझनमध्ये जमिनीवरच रायवळ वा गोटी आंब्यांचे ढीग साठवले जायचे, माळ्यावर आंब्याची अढी घातलेली असायची. त्या खोलीत बसून मनसोक्त आंबे चोखून खाण्याची मुलांमध्ये पैज लागायची!
‘‘आई, लिबाला मोहर आला!’’ बाळ अत्यानंदानं आईला सांगतो.
‘‘फाल्गुन सरला, आता लिंबं मोहरायचीच, परवा तर पाडवा!’’ आई सांगते.
दिसादिसांनी उन्हाळा वाढू लागतो. बाळला शाळेत जायचा कंटाळा येतो. आई त्याला गावदरी शेतातली दृश्यं दाखवते. भर उन्हात शेतकऱ्यांचे नांगर चाललेले असतात. बैलांची तोंडं फेसाळलेली असतात. शेतकऱ्यांच्या अंगावर घामाचे लोट असतात... ‘काम करत राहिलं पाहिजे...’ आई बाळला समजावून सांगत असते. बाळ शाळेला जाण्यात अळमटळम करत नाही. विझत्या चैत्रावर वारा फुंकर मारू लागतो आणि वैशाख अधिकच जळजळू लागतो. गावचा कुंभार घरोघर गार पाण्यासाठी डेरे पोहोचवतो. घरात धान्याची टंचाई जाणवू लागते. कणगी तळाला पोहोचलेल्या असतात. हिरव्या भाजीचा दुष्काळ होतो...