

Social Service Gone Wrong
esakal
चंद्रशेखर जोशी
गोळा झालेल्या कागदपत्रांतून सर्वांशीच संपर्क व्हायचा असे नाही. परिणामी, अशी बेवारस कागदपत्रे, फोटो, कार्ड्स माझ्या घरी जमा होऊ लागली, आणि पत्नीच्या ‘लष्कराच्या भाकऱ्या...’ या शुभवचनाला चांगलीच धार येऊ लागली. ‘एखाद्या दिवशी याल गोत्यात’ असे जोडकामदेखील करण्यात येऊ लागले आणि हा तिचा शाप प्रत्यक्षात येण्याचा योग लवकरच आला!
स.न.वि.वि.
माननीय दीपक दिवटेसाहेब, पोलिस उपनिरीक्षक, सातुर्डे रेल्वे पोलिस स्टेशन, अंकित रेवडी पोलिस ठाणे.
पत्रास कारण की, माझ्यासारख्या सेवानिवृत्त माणसाची कुणीच पत्रास ठेवत नसताना आपण आणि आपल्या प्रामाणिक सहकाऱ्यांनी ती ठेवली, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आपण केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाने प्रभावित होऊन मी माझा एकमेव, बिना भांडवलाचा, बिना परवानगीचा, बिना नोंदणीचा आणि बिना मोबदल्याचा छोटासा सामाजिक उपक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचे ठरवलेले आहे.
‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका’ असे बायकोचे टोमणे ३६५ दिवस ऐकूनसुद्धा गोष्टीमधल्या विक्रमादित्याप्रमाणे माझा उपक्रम मी चालू ठेवला होता.
भारत देशाला बलवान करण्यासाठीच्या स्वप्नातला माझा हा खारीचा वाटा आपण खाऊन टाकलात. एवढेच काय, पण माझी ही सेवावृत्ती बेकरीतल्या खारींप्रमाणे आपल्या कडकपणाच्या चहात कधी विरघळली ते कळलेच नाही. शिवाय आपण जो वेगळाच खार माझ्यावर खाल्लात, त्यामुळे माझी अवस्था पंख कापलेल्या जटायूप्रमाणे झाली आणि सातुर्डे सोडून खारच्या घरात राहायला जावे असे वाटू लागले. आपल्यात एवढा खारटपणा निर्माण झाल्याने आपण दिलेला विद्युत झटका इतका जोरदार निघाला, की माझे मतपरिवर्तन झाले. तथापि, मूळ कथा आपल्याला सांगण्याची संधी मी यानिमित्ताने साधणार आहे.