

The Art of Reading Between the Lines
esakal
प्रणव बापट
काही वेळा काही गोष्टी आपण उलगडून, त्यांना शब्दाचं अस्तर लावून सांगितल्या, की त्यातल्या भावनेचं सुंदर असणं अचानक कमी होऊन जातं, असं मला मनापासून वाटतं. ती भावना मग कोणतीही असो. राग, प्रेम, मोह, माया, सुख, दुःख अशी कोणतीही भावना याला अपवाद नाही. कवितांच्या, कथांच्या, ललित लेखांच्या मधल्या ओळींत आलेलं, लिहिणाऱ्यानं मुद्दाम उलगडून न सांगितलेलं दुःखसुद्धा अशावेळी सुंदर असतं. फक्त ते आपल्याला ‘वाचता’ यायला हवं...
कित्येकदा आपण पूर्वी एकदा वाचून झालेलं एखादं पुस्तक परत वाचायला घेतो. माहीत असलेली गोष्ट नव्यानं वाचतो. लेखकानं लिहिलेली वाक्यं, घटना पुन्हा एकदा समजून घेतो. ते पुस्तक वाचून पूर्ण करतो. त्यानंतर आपल्याला जाणवतं की यावेळी ते पुस्तक वाचताना आपल्याला काही नवेच अर्थ लागले, काही नव्या गोष्टी लक्षात आल्या, काही गोष्टी नव्यानं लक्षात आल्या. लिहिणाऱ्यानं लिहून ठेवलेलं एखादं वाक्य वेगळ्याच संदर्भात आपल्याला नव्यानं उमगलं. असं का बरं होतं? याचं अतिशय सोपं आणि खरं कारण म्हणजे, वाचताना आपण केवळ जे लिहिलं गेलं आहे ते वाचत नाही, तर त्या ओळींच्या मधे न लिहिलेलं असं काही जे अव्यक्त, निराकार साकार झालेलं असतं तेही वाचतो.