

Urban Quality of Life
esakal
डॉ. अमेय खरे
शहराची खरी उंची उंच इमारतींवरून, रुंद रस्त्यांवरून किंवा पायाभूत सुविधांवरून ठरत नाही, ती तिथल्या नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेनं ठरते. आज शहरं भारताच्या आर्थिक विकासाची प्रमुख केंद्रं आहेत आणि भविष्यात त्यांचं महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहरांचा विकास करताना आर्थिक वाढ आणि नागरिकांचं दैनंदिन जीवन यांच्यात समतोल राखणं हीच खरी गरज आहे. कारण शहर हे केवळ राहण्याचं ठिकाण नसतं, ते आपल्या आयुष्याच्या गुणवत्तेला आकार देणारं माध्यम असतं.
स न १९९५. महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरात राहणारं एक मध्यमवर्गीय कुटुंब आयुष्यातला कदाचित सर्वात मोठा निर्णय घेत होतं. वडिलांना मोठ्या शहरात नोकरीची संधी मिळाली होती. पगार जास्त होता, भविष्यात प्रगतीची शक्यता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण देता येणार होतं. निर्णय सोपा नव्हता. एका बाजूला होतं स्वतःचं घर, ओळखीचा परिसर, नातेवाइकांचा आधार आणि निवांत आयुष्य. दुसऱ्या बाजूला होतं अनोळखी शहर, भाड्याचं छोटंसं घर, वाढलेला खर्च आणि नव्यानं आयुष्य उभारण्याचं आव्हान. शेवटी त्यांनी शहराची वाट धरली. पहिली काही वर्षं संघर्षात गेली. महिनाअखेरपर्यंत पगार पुरतोय ना, याचा हिशोब ठेवावा लागे. घरभाडं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, रोजचा प्रवास आणि बचत यामध्ये प्रत्येक रुपया जपून खर्च करावा लागे. पण त्यांना विश्वास होता, की हा संघर्ष तात्पुरता आहे. आणि खरोखरच पुढच्या दहा-पंधरा वर्षांत बरंच काही बदललं. नोकरीत बढती मिळाली. उत्पन्न वाढलं. मुलं चांगल्या महाविद्यालयात शिकली. बँकेकडून गृहकर्ज घेऊन स्वतःचं घरही घेतलं. घरात चारचाकीही आली. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर त्या कुटुंबाची परिस्थिती पूर्वीपेक्षा नक्कीच सुधारली होती. पण या बदलांसोबत काही गोष्टी नकळत त्यांच्या आयुष्याचा भाग झाल्या. पूर्वी ऑफिस गाठायला पंधरा मिनिटं लागत होती; आता रोज दीड-दोन तास प्रवासात जाऊ लागले. सुट्टीच्या दिवशी मित्र-नातेवाइकांना भेटण्याऐवजी बँक, बाजार, मॉल किंवा वाहतुकीतच वेळ जाऊ लागला. मुलं मोठी झाली, पण त्यांच्यासोबत निवांत बसून गप्पा मारण्यासाठी वेळ कमी पडू लागला. उत्पन्न वाढलं होतं; पण वेळ, मोकळेपणा आणि मानसिक शांतता मात्र कुठेतरी हरवत चालली होती.