

Social Reality Through Marathi Stories
esakal
राधिका ज्योतीराम पवार
‘आणि विद्येच्या बैलाला’ हा केवळ कथांचा संग्रह नसून, समाजाचे वास्तव दाखवणारा आणि माणसाला स्वतःकडे व समाजाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा साहित्यसंग्रह आहे. सामाजिक वास्तव, शिक्षण आणि मानवी मूल्यांवर आधारित साहित्य वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येकाने हा कथासंग्रह नक्की वाचावा. पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यातील अनेक प्रसंग आणि विचार दीर्घकाळ स्मरणात राहतात.
मराठी साहित्यात वास्तववादी कथांना नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. समाजातील सामान्य माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्यांचे संघर्ष, भावना आणि बदलत्या काळाचे चित्रण करणारे साहित्य आपल्याला नेहमीच विचार करायला भाग पाडते. संजीव लाटकरलिखित आणि विद्येच्या बैलाला हा कथासंग्रह वाचल्यानंतर मला हाच अनुभव आला. पुस्तकातील प्रत्येक कथा काही ना काही सामाजिक वास्तव समोर आणते आणि वाचन संपल्यानंतरही मनात बराच वेळ रेंगाळत राहते.