

पेनने स्थापिलेल्या उदारमतवादी व सहिष्णू राज्यात आश्रय घेणारे अनेक लोक त्या काळात पुढे येणे स्वाभाविकच होते. आपापल्या राज्यांत होणाऱ्या धार्मिक छळापासून मुक्तता होण्यासाठी पेनसिल्व्हानियासारखे ‘अभयारण्य’ इतरत्र कोठे मिळणार? इंग्लंडवर दुसऱ्या जेम्सचे राज्य होते तोवर पेनचे हे वागणे खपवून घेतले गेले...
जागतिक शांततेची चर्चा विशेषतः क्वेकरांच्या संदर्भात करीत असताना रॅम्सेचे उपाख्यान लावण्याचे कारण म्हणजे एक तर त्याने दिलेल्या व्याख्यानानंतर वर्षभरातच पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. दुसरे असे की शांततेच्या प्रयत्नांचा इतिहास सांगत असताना त्याने क्वेकर पंथाच्या योगदानाला पूर्णतः दुर्लक्षित केले. याशिवाय तिसरी गोष्ट अशी आहे, की तो स्कॉटिश असल्यानेच की काय, त्याने स्कॉट लोकांनी, विशेषतः वॉल्टर स्कॉटने केलेल्या लेखनाचे अतिमूल्यांकन केले. असो.
चर्चेचा रोख परत एकदा क्वेकरांकडे नेताना विल्यम पेनकडे परतावे लागते. क्वेकरपंथीयांनी युद्धाला वा युद्धप्रयत्नांना मदत करण्यापासून पूर्णतः अलिप्त राहायचे हे या फॉक्सकालीन मार्गदर्शक तत्त्वाला मुरड घालून क्वेकर पंथाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवायचे काम पेनने केले. आपण युद्धात सहभागी झालो नाही किंवा युद्धप्रयत्नांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साहाय्य केले नाही म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मानणाऱ्यांपैकी पेन नव्हता. क्वेकरांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्ध होऊच नये अशा प्रकारची सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठीही झटले पाहिजे. या उद्देशाने पेन सतत कार्यरत राहिला हे नक्कीच महत्त्वाचे आहे. खरोखर, रॅम्सेसारख्यांनी पेनला अनुल्लेखाने का मारावे हे समजत नाही.